सायबर आर्थिक फसवणुकीचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र (इंडियन सायबर क्राईम को ऑर्डिनेशन सेंटर) च्या अनुसार २०२४ च्या पहिल्या सहामाहीतच सायबर आर्थिक फसवणुकीचा आकडा सुमारे काही हजार कोटी रुपये इतका होता. हे केंद्र, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. केंद्र सरकारने अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘ई- झिरो एफआयआर प्रणाली’ निर्माण केली असून, दिल्लीमध्ये ती प्रायोगिक तत्वावर अंमलात आणली गेली आहे.
याशिवाय बँका, सरकारी विभाग, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सायबर तज्ज्ञ लोकांना नेहमीच सावध आणि सजग करतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे फलक लावले जातात. प्रभावशाली व्यक्तींबरोबर लोकांना जागरूक करणार्या जाहिराती केल्या जातात. त्या वारंवार प्रसारित होतात. तुमचे पासवर्ड कोणाला सांगू नका, बँका त्यांच्या ग्राहकांची फोनवरून चौकशी करत नाहीत किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. मोफत भेट अशा ऑनलाईन अमिषाला बळी पडू नका, हे त्यापैकी काही सामान्य कानमंत्र आहेत. याशिवाय माहित नसलेल्या क्रमांकावरून आलेला फोन शक्यतो उचलू नका, अनोळखी मेल उघडू नका, अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहन नेहमीच केले जाते.
हे कानमंत्र लक्षात ठेऊन अंमलात आणणे अजिबात अवघड नाही किंवा ते लक्षात राहू नयेत असेही नाहीत. तरीही लोक त्याच त्याच चुका वारंवार करताना आढळतात. असे का घडते? कोणतीही सरकारी बँक किंवा संस्था दामदुप्पट आर्थिक परतावा किंवा नियमबाह्य व्याज देत नाही. असे करणे शक्य असते तर ते या संस्थांनी केलेच असते. निसर्गात पैशांचा पाऊस कधीही पडत नाही. तो कोणीच पाडू शकत नाही. तरीही माणसे अशा गोष्टींना भुलतात. बहुसंख्य सामान्य माणसांची आर्थिक परिस्थिती साधारण असते. त्यामुळेच त्यांच्या आर्थिक गरजा अपूर्ण राहू शकतात हे खरे.
तथापि गरज आणि हाव यातील फरक लोक विसरत चालले असावेत का? ‘नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे’ असे समर्थ रामदास स्वामींनी बजावले आहे. अती हाव, स्वार्थ बुद्धी आणि कमी कष्टात जास्तीच्या मोबदल्याची अपेक्षा यामुळे माणसांना या शिकवणुकीचा वा मूल्यांचा विसर पडत चालला असावा. पण ही वृत्ती आता माणसांच्याच मुळावर उठत आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला माणसे बळी पडत आहेत. असे न होणे ही लोकांची देखील जबाबदारी आहे. इंटरनेट सुविधा वापरायच्या. एका क्लिकवर कामे करायची. सायबर क्रांतीचा फायदा घ्यायचा. पण त्यातील काही कळत नाही, आम्ही कसे फसलो हेच समजत नाही हेच म्हणत राहायचे. असा दुटप्पी दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. सायबर आर्थिक फसवणुकीला आळा घालायचा असेल तर लोकांच्या किमान आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही.