काही राज्यांमध्ये उष्मा आणि काही राज्यांवर पावसाचे सावट अशा परस्परविरोधी दोन स्थिती लोक सध्या अनुभवतात. पर्यावरण प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम सगळेच जाणून आहेत. माध्यमे आणि समाजमाध्यमांमुळे त्याची किमान माहिती बहुसंख्य लोकांना आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. माणसांच्या अनेक सवयी त्यांच्याही नकळत प्रदूषणाला हातभार लावतात. थर्माकोलच्या किंवा प्लास्टिकचा वापर असलेल्या पत्रावळींचा वाढता वापर ही त्यापैकी एक सवय.
थर्माकोल वापरावर बंदी असल्याचे सांगितले जाते. तथापि त्याचा छुप्या पद्धतीने वापर सुरूच असल्याचे आढळते. पूर्वी सामूहिक जेवणावळींमधे पळसाच्या पानांच्या पत्रावळी आणि द्रोणांचा वापर केला जायचा. आत्ताही केला जातो पण अगदी अपवादाने. या पत्रावळ निसर्गातील घटकांपासून बनवल्या जायच्या आणि निसर्गात त्याचे विघटन सहजरित्या व्हायचे. तथापि सुविधेच्या नावाखाली त्याची जागा थर्माकोलच्या ताटांनी किंवा प्लास्टिकचे आवरण असलेल्या पत्रावळीनी व पेल्यांनी घेतली. त्यामुळे माणसाची सोय झाली खरी पण प्रदूषणात मात्र भर पडली. थर्माकोलचे विघटन फारच गुंतागुंतीचे आणि प्रदूषण करणारे ठरते. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न अनेक जण त्यांच्या परीने करतात.
दिंडोरीच्या श्री. स्वामी समर्थ केंद्राच्या पर्यावरण गतिविधी विभागाने ‘स्टीलच्या ताटांची बँक’ नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात अनेक ठिकाणी सुरु केली आहे. पंचवीस ते पाचशे माणसांच्या जेवणावळीसाठी या बँकेतून प्रत्येकी ताट, वाटी, पेला आणि चमचा मोफत उपलब्ध करून दिला जातो. थोडीशी रक्कम जमा करून ताटे घेऊन जायची. वापरून झाल्यावर परत आणून द्यायची आणि जमा रक्कम घेऊन जायची. या बँकेची इतकी साधी आणि सोपी कार्यपद्धती आहे. प्रदूषण वाढवणार्या पत्रावळींचा वापर पंढरपूर वारीत होऊ नये आणि लोकांनी पारंपरिक पळसाच्या पत्रावळी वापराव्यात यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही युवा नवा मार्ग चोखाळतात. ते सुपारीच्या झाडापासून पत्रावळीसह वाट्या, चमचे अशा अनेक वस्तू बनवतात. खाण्यायोग्य चमचे देखील उपलब्ध झाले आहेत. म्हणजे एखादा पदार्थ खायचा आणि शेवटच्या घासाला चमचाही खाऊन टाकायचा. प्लास्टिक किंवा थर्माकोलयुक्त पेल्यातून पाणी प्यायला लागू नये यासाठी अनेक जण स्टीलचा छोटा पेला नेहमीच बरोबर बाळगतात.
सामाजिक कार्यकर्त्यांनी शोध घेतला तर देशाच्या कानाकोपर्यात सुरु असलेले छोटे छोटे बदल त्यांच्याही अनुभवास येऊ शकतील. त्यांचा उत्साह टिकवणे हे समाजाचे काम आहे. समस्या तर बहुसंख्य जण जाणून असतील. त्यांच्यातीलच काहींनी उपाय शोधायचा प्रयत्न केला आहे. ‘एकट्याने करून काय होणार’ ही सबब त्यांच्यापुरती निकाली काढण्यासाठी ते धडपड करतात. हे त्यांचे वेगळेपण ठरावे. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलणार्यांना साथ देणे हे लोकांचे नैतिक कर्तव्य आहे.