विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही जुनाट समस्या बनत आहे. शाळकरी मुलांपासून उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. नुकतीच अशी एक घटना अहमदाबादमध्ये घडली. कायद्याचे शिक्षण घेणार्या एक विद्यार्थिनीने आत्महत्या केली. व्यक्तिपरत्वे आत्महत्येची कारणे बदलतात. तथापि निराशा, भविष्याची चिंता, जडलेल्या अयोग्य सवयी जसे की व्यसन, फसवणूक ही काही सामान्य कारणे आढळतात. त्यातून येणार्या अस्वस्थतेमुळे मुले एकदम टोक गाठतात आणि जीवन संपवतात. त्या क्षणी ती भावना खूप प्रबळ असते. तथापि छोट्या मोठ्या कारणांवरून अस्वस्थ होणार्या बहुसंख्य युवांना विराट कोहलीचा आदर्श घेण्यासारखा असू शकेल.
बहुसंख्य युवा विराटला त्यांचा आदर्श मानतात. विराट मैदानात खेळत असतांना त्याचा नावाचा उद्घोष याची साक्ष देतो. पण याच विराटने त्याच्या आयुष्यात निराशा भरू शकेल अशा अनेक समस्यांचा सामना केला आहे. नुकत्याच त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानुसार त्यालाही चुकीच्या सवयी जडल्या होत्या. आहार-विहार-निद्रा याचे कोणतेही वेळापत्रक नव्हते. एकाग्रता जणू त्याला सोडूनच गेली होती. मैदानात त्याच्या नावाचा गजर सध्या तो जसा ऐकतो तशी एकेकाळी त्याची खिल्ली उडवलेली देखील ऐकली आहे. विराट खेळाडू म्हणून संपला आहे अशी टीका सहन केली आहे. त्यालाही निराशा आली असू शकेल. तोही इतरांसारखाच माणूस आहे.
अनेकांच्या याच समस्या असू शकतील. पण त्यानंतर विराटने जे सांगितले तर दिशादर्शक ठरू शकेल. तो म्हणतो, एक दिवस निश्चय केला. आयुष्यात घडणार्या गोष्टींचा आढावा घेऊन आयुष्याची दिशा बदलली. कठोर मेहनत घेतली. आता तो पुन्हा एकदा शिस्त आणि निश्चयाने मैदानात उतरला आहे. विराट मैदान गाजवतो हे आपण बघतोच. हे त्याने कसे साध्य केले याविषयीचे कानमंत्र त्याने युवांना दिले. इतरांशी स्पर्धा किंवा तुलना करू नका. समाजमाध्यमांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा व्यायाम करा. आत्मविश्वास आणि कठोर मेहनत हाच यशाचा पाया आहे हे कधीही विसरू नका असे सल्ले त्याने युवांना दिले. मानसतज्ज्ञही अनेक सल्ले देतात. निराशेतून बाहेर काढणारे मार्ग सांगतात. पण त्यावर, कसे शक्य आहे, नाही जमणार अशीच बहुसंख्य युवांची भावना आढळते. पण आयुष्याला सकारात्मक वळण देणे जगप्रसिद्ध विराटला जसे शक्य आहे तसे ते इतरांनाही शक्य आहे. तात्पर्य, ‘कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती..’ हेच विराटलाही सुचवायचे असावे.