Thursday, February 5, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २६ मार्च २०२५ - शेती-मातीशीनाळ घट्ट व्हावी!

संपादकीय : २६ मार्च २०२५ – शेती-मातीशीनाळ घट्ट व्हावी!

शेतीचे वारसदार, अर्थात शेतकर्‍यांची मुले रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात स्थलांतर करताना आढळतात. त्याची वेगवेगळी कारणे असतात. दिवसेंदिवस बेभरवशाची होत चाललेली शेती हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे. जिरायती शेतीबाबत तर प्रश्न अजूनच तीव्र होतो. त्याला बदलत्या हवामानासह इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जसे की, शेती उत्पादनाविषयीची सरकारी धोरणे! शेती फायद्याची होऊच शकत नाही, असाही अनेकांचा पक्का समज असू शकेल.

अनेकांच्या बाबतीत प्रतिष्ठेचे काम असाही मुद्दा असू शकेल. परिणामी शहरात सर्वप्रकारची विपरीतता सहनकरण्याची त्यांची तयारी आढळते. त्याला त्यांचाही नाइलाज असू शकेल. परिणामी घरोघरची मुले शेतीपासून दुरावत आहेत. केरळ सरकारचा उपक्रम यासाठी दिशादर्शक ठरू शकेल. केरळ सरकारकडून कृषी प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. तेथे युवक आणि विद्यार्थी जातात. शेती करायला शिकतात. शेतीपूरक व्यवसायही त्यांना समजतात. केंद्रातील शेतांत विविध पिके घेतली जातात. त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. आतापर्यंत बारा हजार युवक शेती करायला शिकल्याचे एका बातमीत म्हटले आहे.

- Advertisement -

याशिवाय प्रत्यक्ष शेती करणार्‍यांना पर्यावरणपूरक शेती शिकवली जाते असे प्रयोग गरजेचे असतात. प्रयोग करत राहिले तरच निष्कर्ष काढले जाऊन त्यावर चिंतन करता येईल. अशा प्रयोगांतून अनेक फायदे संभवतात. शेतीत रस घेणार्‍या तरुणांची संख्या वाढू शकेल. शेती करण्याची ती पहिली पायरी ठरेल. शेती केली तरच समस्या समजू शकतात. मातीत हात न घालता त्या समजणे फार वरवरची प्रक्रिया ठरू शकेल. आजचे तरुण तंत्रज्ञानस्नेही असतात. त्याच्या सहाय्याने समस्यांवर उत्तरे शोधली जाऊ शकतात. अनेक जण तसे करतात, हेही लक्षात येईल.

YouTube video player

शेती फायद्याची करणारे मार्ग त्यांना गवसू शकतील. नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण शेतकरी त्यात आघाडीवर आहेत. अनेक जण सेंद्रीय शेती करतात. समूहाने शेतमालाचे विक्री व्यवस्थापनही करतात. त्यांच्या कार्याची दखल ‘देशदूत’ नेहमीच घेतो. त्यांच्या यशोगाथा वाचकांपर्यंत पोहोचवतो. याशिवाय आणखी एक संस्कार मुलांवर घडू शकेल. बहुसंख्य मुलांची वाढत्या वयात मातीशी नाळ तुटते. शहरी भागात तर मुलांचा मातीशी संबंधच कमी झाला आहे. मुलांना मातीत खेळण्यास पालकांचा नकार असतो. अशा केंद्रांमुळे मुले मातीत खेळतील. मानवी आयुष्यातील मातीची भूमिका आणि अपरिहार्यताही जाणवू शकतील. कचर्‍याचे व्यवस्थापन मुले शिकू शकतील. अनेकार्थांनी असे उपक्रम स्वागतार्ह ठरतील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...