Wednesday, June 4, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : ३ जून २०२५ - सिंहस्थाचे शिवधनुष्य पेलणार कसे?

संपादकीय : ३ जून २०२५ – सिंहस्थाचे शिवधनुष्य पेलणार कसे?

येऊ घातलेल्या सिंहस्थ मेळ्याचा अधिकृत कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन नुकताच जाहीर केल्यामुळे राज्य शासन काही प्रमाणात का होईना पण सिंहस्थाविषयी विचार करीत असल्याचा दिलासा नाशिककरांना मिळाला. सिंहस्थ बावीस महिने चालणार आहे. महंत, साधू, आखाडा प्रमुखांच्या उपस्थितीत सिंहस्थाची नांदी झाली खरी पण तो पार कसा पडेल याविषयी मात्र स्थानिक नागरिकांसह प्रशासनातील बव्हंशी अधिकारीही कमालीचे साशंक आहेत.

- Advertisement -

सिंहस्थ तयारीच्या दृष्टीने अनेक कामांना अद्याप सुरुवातच झालेली नसल्याने राहिलेल्या दीड-पावणदोन वर्षात सिंहस्थाचे हे शिवधनुष्य पेलणार कसे याचे उत्तर मात्र मिळत नाही. सिंहस्थाच्या उत्सवी कार्यक्रमाची माहिती देतांना त्यासाठी करावी लागणारी प्रशासकीय कामे पूर्ण होण्याची निदान अंतिम मुदत तरी जाहीर केली असती तर जनतेचा विश्वास तरी बसला असता. अर्थात ती जाहीर करण्यासाठी नियोजन आवश्यक असते आणि तोच तर कळीचा मुद्दा आहे.

फक्त कोट्यवधींच्या कामांच्या घोषणा करून नाशिककर खुश होणार नाहीत की सिंहस्थ निर्धोक पार पडणार नाही. सिंहस्थाचा विषय निघाला की प्रयागराज कुंभमेळ्याचा, तेथील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांचा दाखला दिला जातो. पण त्याचे श्रेय त्या राज्याने किमान पाच वर्षे आधी सुरु केलेल्या नियोजनाचे आहे, हे मात्र विसरले जाते. इथे तर मेळा सुरु व्हायला जेमतेम दीड- दोन वर्षांचा कालावधी उरला आहे.

हजारो कोटींची कामे सध्या तरी केवळ आश्वासनांच्या पातळीवर आहेत. कोणकोणती कामे केली जाणार आहेत हेच वारंवार सांगितले जाते. ती यादी अधूनमधून माध्यमात प्रसिद्धही होते. तथापि ती कामे कशी आणि कधी केली जाणार आहेत यावर प्रशासकीय चुप्पी अनुभवास येते. नाशिककर आणि बहुधा नाशिकचे लोकप्रतिनिधी देखील त्यापासून अनभिज्ञ असावेत. तयारीच्या बैठकांना न बोलावून स्थानिक लोकप्रतिनिधींनाच विश्वासात घेतले जाणार नसेल तर सिंहस्थाचा हा जगन्नाथाचा रथ कोणाच्या भरवशावर ओढणार? कोट्यवधींच्या कामांच्या घोषणांनी रंजन तेवढे होते. मुळात आडातच नसेल तर पोहर्‍यात कसे येणार याचा विचार व्हायला हवा.

घाटांचे मजबुतीकरण, सुशोभीकरण, नव्या पुलांची निर्मिती, जुन्या पुलांची दुरुस्ती, डागडुजी, शहराच्या विविध भागांना जोडणारा रिंगरोड, प्रदूषणमुक्त गोदावरी, साधूग्रामसाठी जागेचे कायमस्वरुपी आरक्षण अशा पायाभूत सुविधा सध्या तरी केवळ चर्चेच्या पातळीवरच आहेत. सिंहस्थ प्राधिकरण नेमले जाणार होते. त्याबाबतही अद्याप काहीच स्पष्टता ऩाही. गर्दीचे नियोजन हा सर्वाधिक ताणाचा मुद्दा ठरू शकेल.

एका सिंहस्थात झालेल्या चेंगराचेंगरीने प्रशासनाचे तोंड पोळले आहेच. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी कशी घेणार? सखोल नियोजन असूनही प्रयागराज कुंभमेळ्यातही दुर्घटना घडल्या. त्यामुळे गर्दीचे नियोजन कसे करणार हा मुद्दा प्राधान्यक्रमावर असेल का? अरुंद गल्लीबोळा, रस्ते, रामकुंड किंवा त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त हेच भाविकांचे आकर्षण याचा विचार कसा केला जाणार आहे? की भाविक येतील आणि जातील असेच गृहीत धरले जात असावे? उठता बसता धर्म-संस्कृतीचा जागर करणारे सध्या सत्तेवर असल्याने सिंहस्थाचा विषय अधिक गांभीर्याने हाताळला जावा असे नाशिककरांना वाटते आहे.

सिंहस्थ भव्य-दिव्य होईल याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही, प्रश्न फक्त तो सुरळीत, सुव्यवस्थेत पार पडेल, याची शाश्वती शासनाने बोलबच्चनगिरीतून नव्हे तर कृतीतून द्यायला हवी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : विरोध झुगारून गोदावरीत यांत्रिकी गेटचा रेटा

0
नाशिक | Nashik गोदावरी नदीच्या (Godavari River) पूरजन्य परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह संथ गतीने व स्वच्छ पद्धतीने पुढे जावा, यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत यांत्रिकी गेट उभारण्याचा...