Thursday, May 15, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : ३१ मार्च २०२५ - मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

संपादकीय : ३१ मार्च २०२५ – मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

मुलींच्या शिक्षणातील अडथळे अजूनही थांबायला तयार नाहीत. देशाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार मुलींच्या शिक्षणाचा विशेष विचार केल्यास केंद्र सरकार सांगते. मुलींना उच्च शिक्षण मोफत असल्याचे आणि त्यात अडचणी असतील तर संपर्कासाठी एक क्रमांक राज्य सरकार जाहीर करते. अनेक योजना राबवल्या जात असल्याचा दावा सरकारे करतात. तरीही शिक्षण घेण्यासाठीचा मुलींचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना आढळतो.

- Advertisement -

तुळजापूरमध्ये मायलेकीच्या आत्महत्येचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली सापडली. त्यानुसार मुलीला शिकू न देता तिचा विवाह लावून दिल्याने मुलगी व तिच्या आईने आत्महत्या केली असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. याविषयी पोलिसांच्या अधिक पडताळणीनुसार घटनेवर अधिक प्रकाश पडेल कदाचित, पण सामान्य स्तरावर मुलींना शिक्षण घेण्यासाठी लढावे लागते हे वास्तव आहे. याविषयीची आकडेवारी आणि सर्वेक्षणांचे निष्कर्षही अधूनमधून प्रसिद्ध होतात. तेही या वास्तवाकडेच अंगुलीनिर्देश करतात. त्याची अनेक कारणेही त्यात नमूद असतात.

उदाहरणार्थ, साधनांची अनुपलब्धता, शिकण्यासाठी दूर जावे लागणे, कौटुंबिक परिस्थिती वगैरे. पण त्या सगळ्यांचे सार समाजाच्या मुलींकडे बघण्याच्या पारंपरिक मानसिकतेत दडलेले आढळते. कितीही शिकली तरी मुलगी म्हणजे परक्याचे धन…! शेवटी चूल आणि मूलच सांभाळायचे… तिच्या शिक्षणाचा तिच्या पालकांना फायदा…! या दृष्टिकोनाची पाळेमुळे अजूनही खोलवर रुजलेली आहेत. सुनीता विल्यम्स अंतराळातून सुखरूप परत आल्या. त्या मुद्याला धरून तीन महिलांमधील संवादाची एक छोटीशी विनोदी ढंगाची गोष्ट समाज माध्यमातून फिरली. तिला तिच्या पतीने (गोष्टीत नवर्‍याने) बरे पाठवले. तिला वाळवण किंवा घरकाम नसते का? या काळात तिची मुले कोणी सांभाळली असतील? असे अनेक प्रश्न त्या महिलांना (गोष्टीत बायकांना) पडतात.

विनोद म्हणून या गोष्टीकडे पाहिले गेले तरी त्यातील व्यंग मात्र खरेच कोणाच्या लक्षात आले नसावे. त्यातून महिलांविषयीचा सामाजिक दृष्टिकोन दिसतो. तो त्यांच्या अंगी किती भिनला आहे हेही लक्षात येऊ शकेल. शिकलेल्या मुली डोक्यावर मिरे वाटतात हा एक लाडका भ्रम आढळतो. तथापि शिक्षण मुलींना विचार आणि त्यांच्या आचरणात विवेक बहाल करतो. याची कितीतरी उदाहरणे समाजात अवतीभवती सापडतील. ‘मुलगी शिकली आणि प्रगती झाली’ हा नुसताच सुविचार नाही हे अनेक महिला त्यांच्या आचरणातून दाखवतात. अपवादाने का होईना, पण मुली शिकण्याचा अट्टाहास करतात. त्यांची संख्या जलद गतीने वाढावी अशीच जाणत्यांची अपेक्षा असेल. त्यासाठी समाजाची वर उल्लेखलेली मानसिकता बदलण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. सुजाण नागरिकांनाही त्यात त्यांचे योगदान द्यावे लागेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...