रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएल विजेता संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संवेदनशील माणसांना कविवर्य बाबुराव बागुल यांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या ओळींची आठवण झाली असेल. कोणत्याही घटनेत किडामुंगीसारखी माणसे मरतात आणि त्याचे कोणालाच काहीच वाटत नाही. या दुर्दैवी मुद्यावर पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे.
राजकारण करण्यासारखे ढीगभर विषय आजूबाजूला असतांना माणसांच्या मरणावर राजकारण करण्याइतके निर्ढावलेपण हेच सध्याच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य बनत चालले आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृत्यूचा अस्थानी उल्लेख ते दर्शवतो. अशा घटनांना मिळून सार्यांचा निष्काळजीपणाच कारण असतो. पण ज्यांच्यावर वेळ येते ते ती झटकतात आणि इतरांवर ढकलतात. निगरगट्टपणाचे वर्णन करतांना ‘गेंडयाची कातडी’अशा शब्दप्रयोग केला जात. त्याचा यापेक्षा वेगळा अर्थ काय असू शकेल? बाहेर माणसे चेंगरली होती पण तरीही स्टेडियमध्ये उत्सव सुरूच होता. याला काय म्हणावे? स्वतःच्या आनंदापुढे कोणालाही काहीच दिसू नये का? विजयोत्सव इतक्या तातडीने साजरा करण्यामागे काय हेतू असू शकेल. इतक्या तातडीने हा समारंभ करण्याची आवश्यकता नव्हती.
समाजात आयपीएलचे गारुड कायम असताना असा कार्यक्रम घेऊ नये इतकाही विवेक दाखवला गेला नाही. कार्यक्रमाचे मोफत पास वाटण्याची आवशकता नव्हतीच. कारण भारतीय लोकांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. पण ते प्रेम उन्मादात रूपांतरित होऊ शकते याची जाणीव आयोजकांना आणि सरकारलाही नसावी का? मध्ये काही दिवस जाऊ दिले असते तर विजयाची नशा कमी झाली असती का? या कार्यक्रमाला लाखो लोक जमतील याचा अंदाज यायलाच हवा होता. काही हजारांची क्षमता असलेल्या जागेत लाखोंनी माणसे कोंबली. या घटनेला आयोजक देखील तितकेच जबाबदार आहेत.
बळी गेलेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली म्हणजे सरकारची जबाबदारी संपत नाही. कुटुंबाने गमावलेल्या माणसाची जागा पैसे घेऊ शकतील का? या घटनेत काहींनी त्यांची तरुण मुले, काहींनी घरचा कर्ता गमावला असेल. कुटुंबातील आप्तांच्या मृत्यूचे दुःख त्या त्या कुटुंबासाठी न संपणारे असते. राजकीय पक्ष सामान्य माणसांना भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवतात आणि माणसेही झुलतात. त्याची फिकीर कोणालाच वाटेनाशी झाली आहे. उलट लोकभावनांच्या झुलीवर स्वार्थी राजकारणाची पोळी भाजून घेण्याला मुत्सद्दीपणाचे लेबल लावले जाते. माणसे मृत्यूला जास्त घाबरतात असे मानले जाते. तथापि अशा कार्यक्रमांना माणसे ज्या संख्येने जमतात ते पाहाता माणसे मृत्यूला घाबरत नसावीत असा त्याचा अर्थ निघू शकेल.
गर्दी बघून त्यांच्याही अंगावर काटा येत नाही. आपण कुठे जात आहोत? का जात आहोत? जिथे जाणार आहोत तिथला भवताल कसा आहे? दुर्घटना घडू शकते अशी पुसटशी शंका येऊ नये का? असे साधे प्रश्न देखील जिथे तिथे गर्दी करणार्या माणसांना पडत नाहीत. 20-20 विश्वचषक जिंकल्यावर मुंबईत संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हाही अशीच लाखोंची गर्दी जमली होती. चेंगराचेंगरीच्या घटनांच्या भूतकाळातून माणसे काहीच शिकली नाहीत हेच खरे. माणसांचे मरण स्वस्त केले गेले आहे आणि माणसांनीही ते करून घेतले आहे. आता याही घटनेच्या चौकशीची मागणी सुरु झाली आहे. ती कदाचित केलीही जाईल. चूक कोणाची तेही कदाचित शोधले जाईल. पण पुढच्याला ठेच लागूनही मागच्यांना शहाणपण येणारच नसेल तर अशा चौकश्या म्हणजे फक्त उपचारच ठरतील. नव्हे ठरतात.