पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील दैठणे गुंजाळमध्ये बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या भागात त्यास पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत दैठणे गुंजाळचे माजी उपसरपंच विलास पाटील यांनी त्यांच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर कैलास गुंजाळ यांच्या शेतात गवतात लपून बसून त्यांच्याजवळील मल्हारी गुंजाळ यांच्या घराजवळील चार ते पाच कोंबड्या व शेळीवर बिबट्याने हल्ला केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रोज बिबट्या हा कोणाच्या ना कोणाच्या दृष्टीत पडत आहे.
यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असून अनेक शेतकरी शेतात जाण्यासही भित आहेत. तर काही रात्री घराच्या बाहेर पडण्यास भित आहेत. तरी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी गावकर्यांनी मागणी केली आहे. प्रत्यक्ष दर्शी भीमराज घोलप, बबन येवले, संदीप गुंजाळ, खंडू गुंजाळ, भाऊ उद्धव गुंजाळ प्रताप झांबरे, तसेच भुमिपुत्र शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष रावसाहेब झांबरे यांनी पिंजर्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
दैठणे गुंजाळ परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्या शेतात हा ग्रामस्थांच्या निदर्शनास येत असून अनेक कोंबड्या व जनावरांवर त्याने हल्ला केला आहे. शेतातील मोठ्या गवतामध्ये बिबट्या लपून बसत असून त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर बिबट्या पकडण्यासाठी पिंजर्याची व्यवस्था करावी.
– रावसाहेब झांबरे, तालुका अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना पारनेर