पंचवटी । प्रतिनिधी
एका नामांकित कंपनीच्या औषधामुळे द्राक्ष पिकावरील भुरी हा आजार बरा होण्याऐवजी अधिक वाढल्याने एक्स्पोर्ट द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक्स्पोर्टसाठी तयार द्राक्षे स्थानिक बाजारात कवडीमोल भावात विकण्याची नामुष्की शेतकर्यांवर ओढवली आहे. या कंपनीविरोधात रोष व्यक्त करीत माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी शेतकर्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे.
जगात द्राक्षामध्ये महाराष्ट्र हे एक नंबरला असून, त्यातही द्राक्षपंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. राज्यातील द्राक्ष पीकाच्या 100 टक्यांपैकी 91 टक्के द्राक्ष पीक एकट्या नाशिकमध्ये घेतले जाते. करोना काळात द्राक्षाला मागणी नव्हती, त्यानंतर बेमोसमी पावसाने सलग दोन वर्षे द्राक्ष पीक हातातून गेले होते. त्यामुळे सलग तीन वर्षे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका बसला होता.
मध्यंतरीच्या काळात द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगांवर एका नामांकित कंपनीचे औषध निर्मिती केली. या कंपनीचे औषध शेतकर्यांनी यांचा वापर केला. मात्र, रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी हे औषध अयशस्वी ठरले. शिवाय रोगाचा प्रादुर्भावही वाढला. यामुळे एक्सपोर्ट कंपन्यांकडून द्राक्ष माल नाकारला गेला. एक्स्पोर्ट क्वालिटी द्राक्ष अक्षरशः स्थानिक बाजारात विकावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माजी खासदार पिंगळे यांनी हा प्रश्न उचलून धरत शेतकर्यांना पाठिंबा दिला आहे.
पिंगळे यांचे शेतकर्यांना आवाहन
ज्या शेतकर्यांनी भुरी या आजारावर या नामांकित कंपनीचे औषध वापरले, मात्र काही परिणाम न होता भुरी या रोगामुळे द्राक्ष एक्स्पोर्ट सँपल नाकारले गेले आहे. अशा शेतकर्यांनी आपले एक्स्पोर्ट द्राक्ष सँपल नाकारले गेल्याचे प्रमाणपत्र व सदर औषध वापरल्याचे असल्याचा पुरावा (बिल) जोडावे आणि कागदपत्र हे आमदार दिलीप बनकर व आ. सरोज आहिरे यांच्याकडे सादर करावे. तसेच संबंधित भागातील तालुका कृषी अधिकारी यांचेकडेदेखील लेखी तक्रार करावी, असे आवाहन माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.
दोन्ही आमदारांनी विधिमंडळात मांडला प्रश्न
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या समवेत निफाडचे आ. दिलीप बनकर व देवळालीच्या आ. सरोज आहिरे यांनी संबंधित नामांकित कंपनीचे औषध वापरूनदेखील भुरी आजार कमी न होता वाढून द्राक्ष पिकामुळे नुकसान झाले असल्याबाबत चर्चा केली. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विधिमंडळात प्रश्न मांडला आहे.