Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedसमृध्दी महामार्गावर अनफिट वाहनांना ‘नो एन्टी’

समृध्दी महामार्गावर अनफिट वाहनांना ‘नो एन्टी’

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (Nagpur-Mumbai Samriddhi Highway) वाढत्या वाहन अपघाताने (accident) धास्तावलेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनफिट वाहनांना या रस्त्यावर अपघाताचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अनफिट वाहने या मार्गावर आणू नये असे स्पष्ट निर्देश आरटीओच्या (rto) वतीने देण्यात आले आहे. 

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वाहन तपासणी मोहिमेत गेल्या ४५ दिवसांत तब्बल २ हजार ५०० वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत समृद्धी महामार्गावर जाण्यायोग्य नसलेली तब्बल १५० वाहने माघारी पाठविण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी परिवहन विभाग व समृद्धी महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्‍त विद्यमाने जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये वाहनधारकांना समृद्धीवर जाण्यापूर्वी वाहनांची हवा किती असावी, गाडीची स्थिती, टायरची स्थिती यासह इतर महत्त्वाच्या बाबींची तपासणी याबाबतचे मोठ-मोठे फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकावरील दुर्लक्ष करून समृद्धींवर वेगाने वाहन पळवणाऱ्या लोकांवर  आळा बसवण्यासाठी परिवहन विभागाने मोटार वाहन निरीक्षकांमार्फत थेट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर चढ-उतारासाठी हर्सूल सावंगी, माळीवाडा-जंभाळा, लासूर आणि वैजापूरसाठी जांबरगाव फाटा आदी ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर आरटीओने पथक तैनात केले आहे. १० एप्रिलपासून ही तपासणी मोहीम सुरू झाली असून आतापर्यंत २ हजार ५०० वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासणीतून टायर खराब असलेल्या अनेक वाहनांना आरटीओ पथकाने समृद्धी महामार्गावर जाण्यास मज्जाव करत १५० वाहनांना परत पाठविले. या सर्व वाहनांमध्ये टायरची परिस्थिती योग्य नसणे, रिफ्लेक्टर्स किंवा अन्य तांत्रिक दोष असणे या कारणावरून त्यांना समृद्धीचा प्रवास नाकारण्यात आलेला आहे. या तपासणीत दहापेक्षा अधिक वाहने, ज्या वाहनांमध्ये इंजिनचा आवाज येणे किंवा वाहन वेगात चालविल्यास त्याचा एखादा पार्ट तुटून पडण्याचा धोका आहे, अशी दृश्य स्वरूपातील वाहनेही परत पाठविण्यात आलेली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या