मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे…
फडणवीसांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तुमच्यात खूपच कटुता आली असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, माझ्याकडून कुठलेही वैर नव्हतं. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असे वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच पुढे ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या, मला जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना देण्यात आले होते. अर्थात मी असे काहीच केले नव्हते की, ज्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असे फडणवीसांनी म्हटले.