पुणे | Pune
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच, दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींकडूनही एकत्र येण्याबाबत संकेत दिले जात आहेत. मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत पक्षातील नेत्यांकडून त्याबद्दलची वक्तव्येही करण्यात येत आहे. तसेच, उद्धव ठाकरेंनी देखील आज एका वाक्यात महत्त्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. यावरून शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला असता आधी त्यांनी उत्तर देण्यात टाळाटाळ केली.
शिवसेना-मनसे युतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हणाले, “आमची महायुती मजबुतीने लढणार आणि मजबुतीनेच जिंकणार,” असे म्हणत त्या प्रश्नाला बगल दिली. आता यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच त्यांनी हात जोडल्याचं पाहायला मिळाले.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मंडली नसताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीसंदर्भात बोलताना, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केले. तसेच, आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
लवकर निर्णय घेणारा मंत्री
क्रेडाईचा कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. मी आज माझी सगळी टीम घेऊन आलो आहे, कोणीतरी आता मला म्हणाले की लवकर निर्णय घेणारा मंत्री आहे. No reason on the spot decision अशी माझ्या कामाची पद्धत आहे, असा डायलॉग एकनाथ शिंदेंनी मारला. तसेच, मी देवेंद्रजी, अजित दादा एकत्र टीम म्हणून काम करतोय, जे थांबलेले कामं होते त्यांना आम्ही चालना दिली. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, कार शेड, अटल सेतू, पुणे मेट्रो यांना चालना देणारे काम केले, यावर लागलेले सगळे स्टे मी काढून टाकले. काम कसे होणार नाही हे सांगायला स्कील लागत नाही, न होणारे काम कसं होईल हे सांगायला लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा