मुंबई | प्रतिनिधी Mumbai
आगामी विधिमंडळ अधिवेशनात आपल्या मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे मांडा, सरकारवर तुटून पडा, असा आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या गटाच्या आमदारांना दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व्हीप लागू होणार नाही. तेव्हा व्हीपला न घाबरता प्रश्न मांडा. कायदेशीर लढाईचे मी पाहतो, तुम्ही मतदारसंघाकडे पहा, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली लढाई आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना सतावणारी व्हीप लागू होण्याची भीती या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ वर आपल्या गटाच्या आमदारांची बैठक घेतली. बैठकीला ठाकरे गटातील सर्व १६ आमदार या उपस्थित होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांना मार्गदर्शन करताना जनतेच्या प्रश्नावर आक्रमक राहण्याची सूचना ठाकरे यांनी केली.
विरोधी गटाने आम्हाला व्हीप बजावला आणि आमची आमदारकी पणाला लागली तरी बेहत्तर, पण आम्ही तुमच्यासोबतच राहू, अशी ग्वाही या आमदारांनी ठाकरे यांना दिली. आम्ही कुणाचाही व्हीप मानणार नाही. तुम्ही दिलेला आदेश हाच आमचा व्हीप असेल, असा शब्दही आमदारांनी ठाकरे यांना दिला.