Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यासप्तशृंगी गडावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी

सप्तशृंगी गडावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Garh

इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सप्तशृंगगडावरील नागरिक आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गडावरील काही भाग धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभाग व सार्वजनिक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी असलेले पत्र सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

- Advertisement -

पत्रात म्हटले आहे की, भगवती मंदिराच्या पायर्‍यांच्या परिसरात भूस्खलन झालेल्या धोकादायक भागात तत्काळ उपाययोजना करणे जरुरीचे आहे. इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाशिकमधील सप्तशृंगीगडकडे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष द्यावे, गडावर लोकवस्ती डोंगराच्या पायथ्याशी स्थित असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्य करत आहेत. काही वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण दुर्घटनेनंतर तेव्हाही सप्तशृंगी गडाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळीदेखील स्थानिक ग्रामपंचायतीने पत्र दिले होते.

गडावर जाणार्‍या पायर्‍यांच्या बाजूला माती साचल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गडावरील पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची गरज आहे. याबाबतच्या केलेल्या पाहणीत अतिवृष्टी झाल्यास भविष्यात लोकवस्तीनजीक असणारा डोंगराच्या पायथ्याचा भाग कोसळण्याची भीती आहे. त्यासंदर्भात वनविभागने उपाययोजना कराव्यात. गडाच्या पायथ्याशी पूर्ण गाव वसलेले असल्याने तत्काळ संरक्षक भिंत उभारावी.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तहसील कार्यालयात बैठक

उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे यांच्या आदेशाने काल (दि.21) कळवण तहसील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीसाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सप्तशृंगी गडाचा प्रश्न मार्गी लावणार : पालकमंत्री

सप्तशृंगीगड येथील आई भगवती मंदिरात जाण्या-येण्यासाठी असणार्‍या पायर्‍यांच्या आजूबाजूचा डोंगराळ भाग असल्याने सदर परिसरात माती साचलेली आहे. त्यामुळे सावध व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. माळीणसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या परिसरात खालच्या बाजूला नागरी वस्ती आहे. त्यामुळे दगडी बांध किंवा संरक्षण भिंत हे काम होणे आवश्यक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आपले सरकार अतिशय सकारात्मक असून संबंधित यंत्रणेला जागेची पाहणी करून अहवाल मागवण्यात आला आहे. लवकरच बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येतील.

– दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या