Saturday, July 27, 2024
Homeराजकीयसीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करा

सीमाभागातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करा

मुंबई / प्रतिनिधी
बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे. संयुक्त महाराष्ट्र हा सरकार आणि जनतेचा दृढनिर्धार असून तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असे स्पष्ट करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी करणारे पत्र अजित पवार यांनी बुधवारी मोदी यांना लिहिले आहे. या पत्रात पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे सांगत आपणही मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे.

- Advertisement -

सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक आणि मानवताविरोधी आहे.सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तत्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६० हून अधिक वर्षे झाली. तरीही बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्राबाहेर आहेत,याकडे पवार यांनी मोदींचे लक्ष वेधले आहे.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्यावतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे.सीमाभागातील मराठी भाषिकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, असा ठाम विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. सीमाप्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा आणि सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत,असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या