मुंबई / प्रतिनिधी Mumbai
राज्यातील महापालिका निवडणूक आपण ज्या मुद्द्यावर लढलो, त्याला जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळे यापुढे आपला अजेंडा विकास हाच असणार आहे. विकासाच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीयाच्या जीवनात मोठे परिवर्तन आणण्यासाठी आम्ही हा विजय समर्पित करत आहोत, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले. नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात या विजयाचा फडणवीस यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आल्या. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करताना महापालिका निवडणुकीतील विजय कार्यकर्त्यांना समर्पित केला. तसेच निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला. भाजपवरील विश्वासामुळे तुम्ही निवडून आला आहात. त्यामुळे या विश्वासाला तडा जाणार नाही अशाप्रकारच्या वर्तनाची अपेक्षा फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांकडून व्यक्त केली.
महापालिका निवडणुकीत भाजप आणि आणि महायुतीला महाविजय मिळाला आहे. या विजयाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडलेले आहेत. मुंबईतील कल लक्षात घेता आहेत मुंबई महापालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल. आजच्या विक्रमी जानदेशाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास आणि प्रामाणिकता हवी आहे. याशिवाय महाराष्ट्राचा विश्वास अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे, हे निकालाने स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होंता म्हणूनच हा विजय आपल्याला मिळाला, असे फडणवीस म्हणाले.
हिंदुत्व हा आमचा आत्मा
हिंदुत्व हा आमचा कार्याचा आणि विचारांचा आत्मा आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, याबद्दल आम्हाला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे नाही. आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. जो जो भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये घेतले आहे. त्यामुळेच आपल्याला एक व्यापक अशा प्रकारचे जनसमर्थन मिळाले आहे, असे सांगत फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना जबाबदारीने वागण्याचा आणि प्रामाणिक कारभार करण्याच्या सूचना दिल्या.
आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण मोदीजींवर जो विश्वास आहे, भाजपावर जो विश्वास आहे, या विश्वासामुळे निवडून आलो आहोत. त्यामुळे या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचे वर्तन कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील, असा विश्वास व्यक्त करत फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीतील विजय भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्याना समर्पित केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते.





