Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसत्तेतील सहभागामुळे विकासाची कामे - उपमुख्यमंत्री अजित पवार

सत्तेतील सहभागामुळे विकासाची कामे – उपमुख्यमंत्री अजित पवार

- Advertisement -

येवला| प्रतिनिधी Yeola

राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण सत्तेत सहभागी झालो. सत्तेत सहभागी झालो असताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आपण कदापिही सोडणार नाही. येवला मतदारसंघात १६६० कोटी रुपयांची कामे झाली. तसेच दहा हजार कोटी रुपयांची कामे नाशिक जिल्ह्यात झाले. सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे जनतेसाठी हजारो कोटी रुपयांची काम आपल्याला करता आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने येवला येथे आयोजित विणकर मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकरांचा सन्मान करण्यात आला.

रघुजी नाईक सरदार यांनी येवल्याची स्थापना केली. त्या येवल्याची महाराष्ट्रातील बनारस अशी ओळख आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला जगभरात पोहचला आहे. त्यामुळे येवल्याच्या झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नाही. विणकर बांधवांनी येवल्याचे वैभव अधिक वाढवले आहे. त्याबद्दल त्याचा सन्मान करतो. आज येवल्याची पैठणी राजकीय लोकांनी देखील अधिक जवळ केली असून निवडणुकीतून काही लोकांनी पैठणी वाटप केल्याच्या चर्चा नाशिक जिल्ह्यात आहे. त्या पैठण्या खऱ्या की खोट्या याबद्दल सांगता येणार नाही अशी मिश्किल टीपणीही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

सत्तेत सहभागी झालो म्हणून राज्यातील महिला भगिनिंसाठी लाडली बहीण योजना आणू शकलो. तसेच शेतकऱ्यांना वीज माफी, मुलींना मोफत शिक्षण, युवकांना स्टाय पेंड सारख्या विविध योजना आणता आल्या. या योजनांच्या लाभातून बळ देण्यासाठी आपण काम करतोय. यंत्राचा विकास अधिक होत असल्याने पारंपरिक वस्त्रउद्योग अडचणीत आला आहे. विणकर बांधवांचे अनेक प्रश्न आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अर्थ संकल्पाचा माध्यमातून वस्त्रोद्योग विभागामध्ये भरीव तरतूद आपण केले आहे. २५ हजार कोटी रुपयांचे वस्त्र धोरण आपण स्वीकारलं असून यातून ५ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. अजूनही काही विणकरांच्या मागण्या आहेत. विणकरांच्या मगण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊन लवकरच किकवी धरणाची उभारणी केली जाईल. आचारसंहिता लगायाच्या आत नार पार ही महत्वपूर्ण योजना मंजूर करण्यात येणार तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. यासाठी हजार कोटी रुपयांची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून हे प्रकल्प आम्ही मार्गी लावू असा विश्वासही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात विकासाचा ध्यास घेऊन आपण कामास सुरुवात केली. विकास हा सर्वांसाठी असून विकास हाच आपला श्वास आहे. त्यादृष्टीने हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण मतदारसंघात केलेली आहे. विकासकामे झाल्याने येवल्याचे नाव आज जगभरात जात आहे.

मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, किसनकाका धनगे, संध्या पगारे, युवक शहराध्यक्ष दिपक लोणारी, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, राजेश भांडगे, गोरख शेंद्रे, गणपत कांदळकर, रवींद्र पवार, मोहन शेलार,संध्या पगारे,बंडू क्षीरसागर, विजय पाटील, अरुण पाटील, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, धनराज पालवे, मच्छिंद्र थोरात, निसार शेख, मुस्ताक शेख, लक्ष्मण कदम, मनोज दिवटे,कैलास पाटील, अल्केश कासलीवाल, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, प्रवीण पहिलवान, श्रीनिवास सोनी, सुनील लक्कडकोट, श्रीकांत खंदारे,देविदास शेळके, जगनराव जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व विणकर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या