मुंबई | Mumbai
जालन्यातील लाठीमाराच्या घटनेवरून राज्यात जोरदार पडसाद उमटलेले आहेत. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे मराठा समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. याचे पडसाद आज मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पडले. या लाठीमारावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला अत्यंत चुकीचा होता. या घटनेबद्दल मी क्षमायाचना करतो. क्षमा मागतो, अशा शब्दांत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच, जालन्यात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. अशा प्रकारे बळाच्या वापराचे समर्थन करता येऊ शकत नाही. मी यापूर्वीही राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यातील घटनेची उच्च चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सरकार दोषींवर नक्कीच कारवाई करेल. दरम्यान, या घटनेवरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी होते. काही तर म्हणाले, लाठीहल्ल्याचा आदेश मंत्रालयातून दिला गेला. अशा प्रकारचे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, लाठीहल्ला करण्याचे अधिकार हे एसपी, डीवायएसपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनाच असतात. त्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नसते.
ज्यावेळे निष्पाप ११३ मारले गेले त्यावेळेस मंत्रालयातून आदेश आला होता. तसेच मावळला शेतकरी गोळीबारात मृत्यूमुखी पडले त्यावेळी ते आदेश कुणी दिले होते का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते? मग त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही? सरकार हे करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.