मुंबई | Mumbai
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे या मागणीसाठी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात अबू आझमींच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ केला. अबु आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पण अभिनेते राहुल सोलापुरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष करत आक्रमक भुमिका घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवाजी महाराज असोत की संभाजी महाराज यांच्याबाबत कोणीही काही बोलत असेल तर ते खपवून घेणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिले त्याचा निषेध करणार आहात का?आहे का हिम्मत? असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले.
नेमके काय घडले सभागृहात?
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरवात झाली आहे. बुधवारी विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारायला सुरुवात केली. “अबू आझमींचा आम्ही निषेध केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी असे आपण सगळ्यांनी ठरवले. पण त्याचबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे अजून मोकाट कसे? अबू आझमींना एक न्याय आणि या दोघांना वेगळा न्याय असे कसे चालेल?” “सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या संस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतले जाते. मी कोल्हापूर एसपींशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर सापडत नाही, हा कुठला प्रकार आहे?” असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विरोधकांनी सवाल विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांवर आगपाखड केली. ते म्हणाले, कोणालाही माफ करणार नाही. अबू अझमींना जेलमध्ये टाकतो .कोरटकर तर चिल्लर माणूस आहे. मात्र आव्हाड म्हणतात की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते. यावर आव्हाड का बोलत नाहीत? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत. जितेंद्र आव्हाड येथे म्हणतात औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्य होता. महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्डवर आहे. आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध तुम्ही का बरे करत नाही?
जवाहरलाल नेहरुंचा केला उल्लेख
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचाही उल्लेख केला. “पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? आहे का हिंमत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे पंडित नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. छत्रपतींच्या विरुद्ध सगळ्यात जास्त पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिले आहे”, असे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले. यानंतर सभागृहातील गोंधळ प्रचंड वाढला होता. सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकुब करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा