Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्र"मी पळून जाणारा नाही तर पराभव…"; फडणवीसांची 'त्या' विधानावर प्रतिक्रिया

“मी पळून जाणारा नाही तर पराभव…”; फडणवीसांची ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

राज्यातील पराभवाची 'ही' चार कारणेही सांगितली

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालात मोठा फटका बसला. राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली होती. यानंतर काल दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शहांनी फडणवीस यांची ही विनंती मान्य केली नाही.

त्यानंतर आज भाजपाने (BJP) मुंबईत पदाधिकारी, आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पराभवाचे विश्लेषण करत विरोधकांनी जे नॅरेटिव्ह तयार केले त्यात ते यशस्वी झाले असे सांगत मी कधी पळून जाणारा नाही तर पराभव अंगावर घेणारा असल्याचे म्हटले. तसेच आगामी काळात ताकदीने जिंकू असे म्हटले आहे.याशिवाय पराभवाची कारणे व विश्लेषण करतांना ११ जागा अशा आहेत, जिथे केवळ ५ टक्क्यांपेक्षा कमी मतांनी आपण पराभूत झालेलो आहोत, असे गणितही फडणवीसांनी मांडले.

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, “देशात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींना जनतेने समर्थन दिले, तिसऱ्यांदा सरकार आले. ओडिशा, आंध्र प्रदेश याठिकाणी आपले सरकार आले. मागील ३ निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेली मते ४३.०९ टक्के तर महायुतीला मिळालेली मते ४३.०६ टक्के आहेत. मतांमध्ये जास्त फरक नाही. पण त्यांना ३१ आणि आपल्याला १७, केवळ २ लाख मते महाविकास आघाडीला मिळाली आहेत. मुंबईचा विचार केला तर महाविकास आघाडीला २४ लाख आणि महायुतीला २६ लाख मते आहेत. याचे विश्लेषण केले तर आपण केवळ ३ पक्षांशी लढत नव्हतो तर एका खोट्या नकारात्मक नॅरेटिव्हला आपण रोखू शकलो नाही असे त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचा दुसरा नेरेटीव्ह तयार झाला. मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिले, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसह अनेक गोष्टी आपल्याच काळात दिल्या गेल्या. मात्र, ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ हा नेरेटीव्ह तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र, ते काही प्रमाणातच यशस्वी झाले. कारण, महायुतीच्या उमेदवारांना ४३ टक्के मतं पडली आहेत, असे गणित फडणवीसांनी मांडले.

त्यासोबतच महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योग गुजरातला पळवले हा तिसरा नॅरेटिव्ह तयार केला. प्रत्यक्ष आकडेवारी पाहिली तर २०२२-२३, २३-२४ या दोन्ही वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरात, कर्नाटक पुढे होते. परंतु आपल्या काळात गुजरात-कर्नाटक यांचं मिळूनही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र रोज खोटे बोलायचे, उद्योग पळवले बोलायचे जर उद्योग पळाले असतील तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात-कर्नाटकपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे कशी आली असती? असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फार सहानुभूती असती तर ती मुंबई, कोकणात दिसायला पाहिजे होती. ठाण्यापासून ते कोकणापर्यंत उबाठा गटाला एकही जागा मिळाली नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर यात एकही जागा मिळाली नाही. मुंबईतील जागा कुणाच्या भरवशावर मिळाल्या हे आपल्याला माहिती आहे. मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असते तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली. शिवडीत ३०-४० हजार मताधिक्य घेऊ शकले नाहीत. मराठी माणसाने मतदान केले असते तर मराठी बहुल भागात उद्धव ठाकरेंना फार मोठे मताधिक्य मिळाले नाही. परंतु विशिष्ट समाजाच्या मतांवर एखाद्या विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्याने त्यांच्या जागा आल्या, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या