मुंबई | Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा शिवप्रेंमींचा विजय आहे, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
मी मोदींचे आभार मानले
यावेळी त्यांनी युनेस्कोच्यो संपूर्ण प्रक्रियेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगभरातल्या शिवप्रेमींचे मी मनापासून अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरिता नॉमिनेट केले होते. खरे म्हणजे, पंतप्रधान मोदींकडे देशभरातून ७ वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या, त्या साइट्सना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरिता आपल्या भारत सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान मोदींनी ठेवले होते. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींचे आभार मानेल की, त्यांनी त्यापैकी जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले ज्यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला जिंजी हा तामिळनाडूत आहे. असे १२ किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
पुढे ते म्हणाले, या १२ किल्ल्याबाबतचे जे स्थापत्य आहे, वेस्टर्न घाट, समुद्र, जंगल अशा नैसर्गिक विविधतेत हे स्थापत्य तयार करण्यात आले, दरवाजे दिसत नाही असे तयार करण्यात आले. अशा सर्व गोष्टी युनेस्को समोर ठेवल्या. वर्षभर त्यांचे डेलिगेशन आले. त्यांनी व्हिजिट केली. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एक डेलिगेशन युनेस्कोत गेले. टेक्निकल सादरीकरण केले. एकूण २० देश सदस्य होते, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांच्या दुतावासांसोबत मीही बोललो. परराष्ट्र मंत्रीही बोलले. आम्ही मोदींनाही भेटलो. तुम्ही नॉमिनेशन केले. मतदानाची प्रक्रिया आहे. २० देश आहेत. भारत सरकारने पुढाकार घ्या असे सांगितले. त्या त्या देशाच्या सरकारशी चर्चा केली.’
आपले परमनंट मेंबर शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव खारगे तिथे उपस्थित होते. २० देशांनी आपल्या बाजूने मतदान केले. एकमताने हे किल्ले जागतिक वारसा केंद्र आहे, हे घोषित केले. हा शिवप्रेमींचा विजय आहे. सर्व देशाच्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि स्ट्रॅटेजी वापरली त्याचे कौतुक केले. किती पुढचा विचार यात केला होता याचे अनेकांना आश्चर्य वाटले. आपले किल्ले वर्ल्ड मॅपवर आले आहेत. युनेस्कोच्या संकेत स्थळावर याची माहिती जाईल. वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





