मुंबई । Mumbai
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली आहे. वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे.
दरम्यान राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.”