ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने (Rain) सुरूवात केली असली तरी आज सकाळपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वच धरणाच्या (Dam) पाणी साठ्यात वाढ होतांना दिसत आहे. आज सायंकाळपासून सर्वच धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ९४ टक्के भरले असून, धरणातून कादवा नदीत ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कादवा काठावरील सर्व गावांनी सतर्क राहावे असे आवाहन दिंडोरी पेठचे प्रांताधिकारी आबासाहेब शिंदे तसेच तहसीलदार मुकेश कांबळे व करंजवण धरण शाखा अभियंता दंडगव्हाण यांनी केले आहे.
तालुक्यात सांयकाळपर्यंत पावसाची संततधार कायम असल्यामुळे करंजवण धरणातून (Karanjwan Dam) टप्याटप्याने विसर्ग करण्यात येणार आहे. तर पालखेड धरणातील (Palkhed Dam) पाणीसाठा ६२.७९ टक्के असला तरी रात्री पाणी साठ्यात वाढ होणार असून, धरणातून कादवा नदीत पाणी सोडण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता सोनवणे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मांजरपाडा प्रकल्प (देवसाने)परिसरात आणि पुणेगाव धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव धरण ८७.२६ टक्के भरले असून, धरणातून जादा पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ओझरखेड धरण (Ozarkhed Dam) आज सकाळी ९८ टक्के भरले होते. रात्री उशिरापर्यंत सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली असल्यामुळे ओझरखेड धरणही १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सकाळपर्यंत धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडण्यास सुरुवात होईल. तर वाघड, तीसगाव हे धरणे आधीच १०० टक्के भरली आहेत. तालुक्यात पावसाची संततधार कायम राहिल्यास रात्री पालखेड धरणातून मोठ्या विसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा
करंजवण धरण -९४ टक्के
पुणेगाव धरण -८७.२६ टक्के
ओझरखेंड धरण -१०० टक्के
पालखेंड धरण – ६२.७९ टक्के
वाघाड धरण -१०० टक्के
तीसगाव धरण -१०० टक्के





