शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यातील आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार असून त्यात संजय राठोड यांची विकेट जाणार, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सावध भूमिका घेत, मंत्री राठोड यांनी सांगितले की, संजय राऊत यांना आम्ही गंभीरपणे घेत नाही. ते सातत्याने बोलत असतात; ते काय बोलतात आणि किती खरे झाले हे आपणच तपासून पाहा. यामुळे त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर चार हात दूर राहणेच पसंत केले.
महाराष्ट्र राज्याच्या वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी शनिवारी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, साईबाबांच्या दर्शनाला मी नेहमी येत असतो. माझे आई-वडील आणि आजोबा दर्शनाला यायचे; आज मी कुटुंबासमवेत दर्शन घेतले. मी सुद्धा शेतकर्याचा मुलगा आहे. कुठे पाऊस आहे आणि कुठे नाही, हे सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वात आमचे सरकार सामान्य माणसांसाठी काम करत आहे.
लोकांसाठी आम्ही अनेक योजना घेतलेल्या आहेत. अशावेळी शेतकर्यांच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, भरभराटी नांदावी आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण राहो, अशी प्रार्थना साईबाबांना चरणी केली. शेतकर्यांची कर्जमाफीसाठी आम्ही बोललो आहोत. मी सुद्धा शेतकर्याचा मुलगा आहे. खरं तर आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही सरकारमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षांपासून काम करत आहोत आणि आता आमच्या सरकारने वेगवेगळ्या योजना आणण्याचे काम केले आहे.
दीर्घकालीन आणि अल्पकालीन योजनांमध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल आणि घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक धोरणे आम्ही अनेक निर्णय चालू केले आहेत. येणार्या काळात शेतकर्यांसाठी योग्य निर्णय घेतले जाणार आहेत. येणार्या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू असे यापूर्वी तिन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जनतेचा आशीर्वादसुद्धा महायुतीला आहे. विधानसभेत अगदी भरभरून मतदान रुपी आशीर्वाद आम्हाला दिले आहे तेच आशीर्वाद आम्हाला पुन्हा महायुती म्हणून मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.





