हंगामी पावसाने राज्यात ठिकठिकाणी थैमान घातले आहे. अनेक शहरे व गावे पाण्यात बुडाली आहेत. कोल्हापूर, नागपूर व विदर्भातील आणखी काही गावांना पावसाने झोडपले आहे. यंदाच्या पुरस्थितीने कोकणात तर हाहाकार माजवला आहे. चिपळूण सर्वस्वी पूरपाण्याच्या वेढ्यात बुडाल्यासारखे झाले आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अनेक गावांचा जनसंपर्क तुटला आहे. त्या त्या ठिकाणचे जनजीवन ठप्प झाले आहे.
अनेक महामार्गांवरची आणि रेल्वे मार्गांवरची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची बचाव पथके ठिकठिकाणी दाखल झाली आहेत. त्यांनी बचावकार्यही सुरु केले आहे. राज्यातील काही छोट्या-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. महाडमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तर हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला आहे.
जलप्रलयाची भयकारी दृश्ये समाजमाध्यमांवर फिरत आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी देखील दूरधवनीवरून चर्चा केली. आगामी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. केवळ पुरप्रसंगीच नव्हे तर कोणतीही आपत्ती कोसळल्यावर यंत्रणा कमी पडते असा अनुभव जनतेला वारंवार का येतो? कोसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला होता.
आपत्ती निवारण यंत्रणेने दक्ष राहावे असा आदेशही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला. ती यंत्रणा सज्ज नव्हती का? तरीही शेकडो-हजारो लोक पुराच्या पाण्यात कसे अडकले? त्यांना पुराचा इशारा दिला गेला नव्हता का? शहरे पाण्याखाली कशी गेली? वाहतूक ठप्प का झाली? यंत्रणा सज्ज असती तर यातील काही प्रसंग टाळता आले असते. यंत्रणा नेहमीच अपुरी का पडते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वर्षानुवर्षे निर्माण होतच आले आहेत.
पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची भीती असते. अन्नपुरवठा, पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनाच्या चार्याचा प्रश्न गंभीर होतो. तो तसा यावेळीही निर्माण होईल अशी भीती जनतेला का वाटत आहे? कोणत्याही आपत्तीचा काही काळ लोटल्यावर जनतेला विसर पडतो. पण तसा विसर यंत्रणेला पडावा का? यंत्रणेची सज्जता सुद्धा झोपी कशी जाते? ‘तहान लागल्याशिवाय विहीर खणायची नाही’ असा दृष्टिकोन सरकारी यंत्रणांच्या अंगवळणी पडला आहे का? याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करेल का? राज्यात पूरपरिस्थिती असतांना नाशिककरांना मात्र पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.
ऐन पावसाळ्यात नाशिकच्या यंत्रणेने हा चमत्कार घडवला आहे. कमालीच्या विरोधाभासाचे हे पाप कोणाचे नाशिककरांना समजेल का? शहराला गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणक्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाणीकपात करावी लागणार असे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले. अशी नाइलाजाची परिस्थिती कधीकाळीच निर्माण होते. ती सतत भेडसावणारी समस्या नव्हे. यावरही ‘जॅकवेल’ हा एक पर्याय सुचवला जातो. तो किती परिणामकारक आहे व त्यामुळे पाणीपुरवठा खरेच वाढत असेल का याबद्दल कोणी निश्चित सांगू शकत नाही.
जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यातील वादही कधीमधी बातम्यांचा विषय ठरतो. पण सहसा सरकारी यंत्रणेच्या वेगवेगळ्या खात्यातील वाद हे फारसे गंभीर कधी ठरत नाहीत हे जनतेचे भाग्य. तथापि यात काही वेळा नागरिक निष्कारण का भरडले जावेत? महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी दोन वेगवेगळ्या विभागातील अधिकार्यांच्या अशा वादाच्या प्रसंगी समंजसपणाची भूमिका घेतल्यास ते वाद फारसे चिघळणार नाहीत.
लोप्रतिनिधींचा समंजसपणा दोन खात्यातील वादप्रसंगी जनतेची गैरसोय निश्चितच टाळू शकतो. पाणीकपातीचा प्रश्न अशा समंजसपणाने दूर ठेवण्याची अपेक्षा नाशिककरांनी लोकप्रतिनिधींकडून करावी का?