नायगाव | वार्ताहर Naigaon
तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील गिते कुटुंबाने नवरदेवाच्या लग्नात डीजे किंवा बँजोची मिरवणूक न काढता वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या या निर्णयाचे ग्रामपंचायतीने स्वागत करत इतरांनीही त्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
उज्ज्वला व रामनाथ आनंदा गिते यांचे चिरंजीव सागर यांचा विवाह आज (दि. ७) दुपारी १२.३५ वाजता गोंदेफाटा येथील कर्तव्य लॉन्सवर झाला. मात्र, गिते कुटुंबीयांनी गावात पारंपरिक डिजे किंवा बँजो लावून नवरदेवाची मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गिते कुटुंबाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत गावात शांत, साधेपणाने विवाह सोहळा पार पाडण्याचा नवा पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने उज्वला, रामनाथ गिते व चिरंजीव सागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीला ३० आंबा झाडांची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
पोलिस पाटील कमलाकर रामराजे यांनी ही रोपे स्वीकारली. यावेळी ग्रामस्थ व महिलांनी नवरदेवावर अक्षता टाकून आशीर्वाद दिले. गावात डीजे संस्कृतीला पर्याय म्हणून वृक्षारोपणाचा संकल्प मांडणार्या गीते कुटुंबाच्या निर्णर्याचे सर्वांनी स्वागत केले आहे.




