नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिला आठवडा गोंधळात संपल्यानंतर आता आज, सोमवारपासून पुन्हा कामकाज सुरू होत असून, पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे पुन्हा तापण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि राज्यसभा, दोन्ही सभागृहात या चर्चेसाठी प्रत्येकी 16-16 तासांचा अवधी देण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरवरील एकूण १६ तासांच्या चर्चेत काँग्रेसला सुमारे ३ तासांचा वेळ देण्यात आला आहे. राहुल गांधी, गौरव गोगोई, प्रणिती शिंदे आणि प्रियांका गांधी यांची नावे संभाव्य वक्त्यांमध्ये आहेत.
गेल्या आठवड्यातील विरोधकांची आक्रमकता, सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तराचा अनुभव पाहता दोन्ही बाजूंनी या आठवड्यात ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह व परराष्ट्र मंत्री या मुद्द्यांवर सरकारची बाजू मांडतील.
सत्ताधाऱ्यांच्या वतीने अनुराग ठाकूर, सुधांशू त्रिवेदी आणि निशिकांत दुबे यांच्यासारख्या मंत्र्यांसह ३० हून अधिक देशांचा दौरा करून परतलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळातील नेते चर्चेत उतरतील. यात श्रीकांत शिंदे, जदयूचे संजय झा आणि तेलुगू देसमचे हरिश बालयोगींचा समावेश असेल.
काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी
एप्रिल महिन्यात पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने त्यांच्या लोकसभा सदस्यांना आजपासून तीन दिवस सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सत्ताधारी आघाडी आणि विरोधी पक्ष राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित दोन मुद्द्यांवर आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




