Wednesday, June 26, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने २२ जागा लढवून ९ जिंकल्या. तर आपण १५ जागा लढवून ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट हा ४२ टक्के तर आपला स्ट्राईक रेट हा ४८ टक्के एवढा आहे. मुंबईत त्यांच्यापेक्षा आपल्याला २ लाख जास्त मते मिळाली आहेत. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत आहे. असे असले तरीही महायुतीबद्दल लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पक्ष कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

येत्या १९ जून रोजी शिवसेना ५८ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. १९ जून या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदारयाद्या दुरुस्त करणे, तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असे खोटे नेरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आशा चुकीच्या नेरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असा निर्धार व्यक्त करून कामाला लागण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीसहित, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. आषाढी वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच त्यांची सोय करावी. तसेच गावागावात वाडी, वस्तीवर शिवसेनेचे फलक लावून शिवसेना शाखा सुरू कराव्यात, अशी सूचना शिंदे यांनी केली.

शिवसेना राबवणार वृक्षरोपणाची मोहीम
यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील तापमान प्रचंड वाढले होते. राज्यातील काही भागातील तापमान ५० ते ५२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १ लाख वृक्ष लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबत अशीच मोहीम पक्षाच्या वतीने राबवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन कामाला लागावे, असे आदेश शिंदे यांनी बैठकीत दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या