मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर त्याच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले होते, यापैकी तीन वार हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे होते. मात्र, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली.
यावेळी बोलतांना लिलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) डॉ.निरज उत्तमानी म्हणाले की, “सैफ अली खानवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी झाली आहे. त्यांना ऑपरेशन थिएटरमधून त्यांना आयसीयूत शिफ्ट केले आहे. एक दिवस त्यांचे निरिक्षण केले जाईल. ते सध्या स्थिर आहेत. ते लवकरच रिकव्हर होतील. त्यांना २ खोल जखमा आहेत. दोन किरकोळ जखमा आहेत. अडीच इंचाचं चाकूचं टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आला आहे. डॉक्टर निना जैन आणि त्याच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेवेळी सैफवर लक्ष ठेवण्यासाठी कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास गोडबोलेही तिथे उपस्थित होते”, असे त्यांनी सांगितले.
तर डॉ.नितीन डांगे म्हणाले की, “सकाळी तीन वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती होती. त्यांच्या मणक्यात मोठी जखम झाली होती. त्यांच्या थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत झाली होती (मणक्यात) चाकूने वार (Stabbing) करण्यात आले होते. त्याचा तुकडा त्याच्या मणक्यात अडकला होता. शस्त्रक्रिया करुन त्यांच्या मणक्यातील चाकू काढण्यात आला. तसेच, स्पाइनल फ्लुइड लिकेजही बंद करण्यात आले. त्याच्या डाव्या हातावर आणि मानेवर आणखी दोन गंभीर जखमा होत्या, त्यावर प्लास्टिक सर्जरीद्वारे शस्त्रक्रिया करुन उपचार करण्यात आले. सध्या सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असून तो रिकव्हर होत आहे. तसेच त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. उद्या त्यांना आयसीयुतून बाहेर शिफ्ट केले जाईल, त्यानंतर दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल”,अशी माहिती त्यांनी दिली.