Sunday, June 30, 2024
Homeनगरभाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा

भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा

डॉ. सुजय विखे पाटील || कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे. पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका. आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा. जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटीबध्द व्हा, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. निवडणूक निकालानंतर डॉ. विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच कार्यकर्त्यांनी डॉ. विखे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करून सभागृह डोक्यावर घेतले. निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता, आता पुन्हा नव्याने आपल्याला काम सुरू करायचे आहे. त्यामुळे परभवाने नाराज होऊ नका, असे भावनिक आवाहन करून डॉ. विखे पाटील म्हणाले, निवडणुकीत पराभव का झाला याची कारणे फार वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देऊन जनतेने आपल्याला विश्वास दाखवला. यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत, आशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे.

विकास काम पूर्ण कसे होतील याचा पाठपुरावा करा. यासाठी थेट संपर्क साधा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. विकास कामांना मोठी मदत होणार आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महिनाभरात सुरू होईल. जी आश्वासने दिली त्याची पूर्तता करण्यासाठी कटीबध्द राहणार असून कुठेही कमी पडणार नाही. कोणी काही चर्चा केल्यातरी 2029 चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले. जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डीले यांनी भाषणात डॉ. विखे यांच्या पराभवाची कारणे खूप वेगळी आहेत. त्याचे विश्लेषणसमोर आले आहे. काही गोष्टींचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पराभवाचे दु:ख असले तरी नाउमेद न होता सर्वांनी एकसंघपणे पुन्हा कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली याबाबत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला सर्वानीच घोषणा आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या