राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेली फुले बळीराजा ही डिजीटल कृषि सल्ला देणारी प्रणाली स्थानिक परिस्थितीनुसार वेळेवर व अचूक सल्ला देणारी आहे. भारत सरकारच्या डिजीटल भारत संकल्पनेला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेले फुले बळीराजा हे अॅप पुरक असून ते प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कृषी विद्यापीठ, जी. आय. झेड., मॅनेज आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने फुले बळीराजा या डिजीटल कृषी सल्ला प्रणालीची ओळख या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनील गोरंटीवार बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे आय.टी. विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. जी. भास्कर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. तानाजी नरुटे, डॉ. बापुसाहेब भाकरे, डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. दिलीप पवार, कराड डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. उत्तम होले, डॉ. जयप्रकाश गायकवाड, डॉ. मुकुंद शिंदे, इंजि. रणजीत जाधव हे उपस्थित होते. यावेळी डॉ. भास्कर, डॉ. तानाजी नरुटे यांनी फुले बळीराजा या प्रणाली विषयी माहिती दिली. नविन होरो, हिमांशू वर्मा व. विश्वंभर राणे यांनी ऑनलाईन संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मुकुंद शिंदे यांनी कार्यशाळेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अवधुत वाळुंज यांनी केले तर आभार डॉ.गोकुळ वामन यांनी मानले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, घटक कृषी महाविद्यालयांचे प्रतिनिधी व कार्यक्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.