Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : ई-पीक पाहणीसाठी अधिकारी थेट बांधावर!

Ahilyanagar : ई-पीक पाहणीसाठी अधिकारी थेट बांधावर!

प्रशासन ‘मिशन मोड’वर || 24 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रब्बी हंगामातील पिकांची ‘ई-पीक पाहणी’ नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी तातडीने पिकांची नोंदणी करावी, यासाठी महसूल प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व मार्गदर्शनासाठी वरिष्ठ अधिकारीच आता थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जे शेतकरी या मुदतीत आपल्या पिकांची ई- पीक पाहणी अ‍ॅपव्दारे नोंद करणार नाहीत, त्यांना पीक विमा, पीक कर्ज व नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारे सरकारी अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

- Advertisement -

तसेच, कोणत्याही शासकीय कृषी योजनांचा लाभ घेता येत नाही. सध्याची स्थिती पाहता शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रशासन आता युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर उतरले आहेत. शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव व देर्डे या गावांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे देर्डे येथे अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर शेतकर्‍यांच्या अडी-अडचणी समजून घेत चक्क स्वतःच्या मोबाईलवरून शेतकर्‍यासमक्ष त्यांच्या पिकाची ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी करून दिली. अधिकार्‍यांच्या या तत्परतेमुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

YouTube video player

दुसरीकडे, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनीही अहिल्यानगर तालुक्यातील चास व पारनेर तालुक्यातील सुपा, महासने या गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार बुधवारी प्रत्यक्ष बांधावर उपस्थित होते. अंतिम मुदतीला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 24 जानेवारीपर्यंत आपली ई- पीक पाहणी पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील शासकीय लाभांपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रत्येक गावात मदतनीस
अनेक शेतकर्‍यांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा स्मार्ट फोन नसल्यामुळे नोंदणी करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रत्येक गावासाठी एका सहायकाची (मदतनीस) नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका किंवा ग्रामस्तरीय कर्मचारी यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या सहायकांना एकल पिकासाठी 10 रूपये प्रति प्लॉट व मिश्र पिकांसाठी 12 रूपये प्रति प्लॉट मानधन निश्चित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....