Sunday, June 8, 2025
Homeअग्रलेखजनतेला किमान शहाणपण तरी कधी येणार?

जनतेला किमान शहाणपण तरी कधी येणार?

राज्यातील टाळेबंदी 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि जिल्ह्यांमधील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध किती प्रमाणात शिथिल करायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही ठिकाणी कडक तर काही ठिकाणी थोडेसे सैल झाले आहेत.

- Advertisement -

आगामी काही दिवस निर्बंधांचे स्वरूप जिल्ह्यातील करोनाच्या टक्केवारीनुसार वेगवेगळे असेल. निर्बंध कसे असतील आणि ते पाळले नाहीत तर संबंधितांवर काय कारवाई केली जाईल हे शासनाने जाहीर केले आहे. तरीही निर्बंध सैल झाल्याच्या पहिल्याच दिवशी रस्त्यांवर आणि बाजारात लोकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. ठिकठिकाणी वाहतूक जाम झाली होती. शहरांच्या गल्लीबोळांमध्ये देखील लोक रस्त्यावर उतरले होते.

याला निर्बंध सैल केल्याचा दुसरा दिवसही अपवाद नव्हता. त्यामुळे काही जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाला दुसर्‍याच दिवशी निर्बंध कडक करण्याचा सूचक इशारा द्यावा लागला. सक्तीच्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकांची छोटी छोटी कामे बंद झाली आहेत. घरकामगारही बेरोजगार झाले आहेत. रोजच्या रोज कमावून खाणारे लोक निर्बंध सैल होण्याची वाट बघत होते. निर्बंध शिथिल झाल्या झाल्या त्यांचे रोजगारासाठी बाहेर पडणे स्वाभाविक आहे.

पोटात दोन घास ढकलायचे असतील तर रोजच्या रोज चार पैसे कमवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो हेही समजण्यासारखे आहे. तथापि रस्त्यावरील सगळीच गर्दी खरेच गरजूंची असेल का? सगळीच माणसे रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडली असतील का? करोनाच्या दुसर्‍या लाटेने आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले. खासगी रुग्णालये देखील करोना रुग्णांनी ओसंडून वाहिली. तरुणाईमध्येही संसर्ग पसरला. मृत्यूदरही काहीसा वाढला. तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे असेही तज्ज्ञांचे इशारे आहेत. करोना हा संसर्गजन्य रोग आहे.

हे जनतेला समजण्यास करोनाच्या अजून किती लाटा याव्या लागतील? निर्बंध पाळले नाही आणि विनाकारण घराबाहेर पडून गर्दी केली तर करोना वेगाने पसरतो हे माहित असूनही विनाकारण घराबाहेर पडण्यात कोणता पराक्रम गाजवल्यासारखे लोकांना वाटत असेल? माणूस समाजशील आहे. गेले वर्ष-दीड वर्ष माणसे घरात बसून आहेत. करमणुकीची साधने फारशी उपलब्ध नाहीत. टीव्ही तरी किती बघायचा आणि मोबाइलवर किती काळ करमणूक करून घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

घरगुती आणि सामाजिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे माणसे वैतागली आहेत. तथापि मित्र मंडळींचा आपसातील संपर्क हा माणसांच्या मनाला विरंगुळा देणारा महत्वाचा घटक आहे इकडेही दुर्लक्ष होऊन चालणार नाही. तरीही माणसांच्या विनाकारण घराबाहेर पडण्याचे समर्थन करता येईल का? करोनाने गेले वर्षभर माणसाला काय काय शिकवले हे सांगणार्‍या पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहेत. माणसांच्या सवयी बदलल्या, आनंद पैशाने विकत घेता येत नाही, कमी गरजांमध्येही खुश राहाता येते, आधुनिक वस्तूंवाचून फारसे काम अडत नाही अशा कितीतरी गोष्टी माणसाला उमजल्या असे सांगणारे लेख प्रसिद्ध होत आहेत.

मग ते शहाणपण निर्बंध सैल झाल्यावर का अनुभवास येत नाही? खूप दिवसांनी ठराविक वेळेत घराबाहेर पडण्याची मोकळीक मिळाली म्हणून त्याचा आनंद घेण्यासाठी माणसे बाहेर पडली म्हणून त्या वागण्याचे समर्थन होऊ शकेल का? विनाकारण घराबाहेर पडण्याचा आनंद घेण्याची ही योग्य वेळ आहे का? हा आनंद उद्या पुन्हा आपल्याला अडचणीत टाकू शकतो हे लोक लक्षात घ्यायला अजूनही का तयार नाहीत? महाराष्ट्र हे पुढारलेले राज्य मानले जाते.

साक्षरतेच्या यादीत महाराष्ट्र राज्य देशात सहाव्या स्थानी आहे आणि राज्यातील साक्षरतेचे प्रमाण 85 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. तथापि माणसांच्या शिक्षितपणाबद्दल शंका उपस्थित व्हाव्यात इतकेच आपण शिक्षित आहोत का? माणसे शिकली म्हणजे सुसंस्कृत झाली असे नव्हे असे नेहमीच बोलले जाते. ते आपल्या वर्तणुकीतून खरे करून दाखवायचे असे माणसांनी ठरवले असावे का? ‘वेड लागले..या लोकांसी वेड लागले..’ हे संत एकनाथांचे भारूड आहे. सगळे कळत असूनही लोकांना काहीच वळत कसे नाही याचे वर्णन नाथांनी या भारुडात केले आहे. करोना बाबतही लोकांना आवश्यक तेवढे माहित झाले आहे.पण ‘कळाले ते वळणार कधी’ आणि लोकांना शहाणपण येणार कधी हाच कळीचा मुद्दा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ठाकरे व पवार यांच्या एकत्रिकरणाच्या निव्वळ चर्चा – मंत्री...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य...