कोरोनाच्या तिसर्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. तिसर्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होईल असे सांगितले जात आहे. या शक्यतेला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे काही तज्ज्ञांचे मत माध्यमांवर प्रसिद्धही झाले आहे.
तरीही ही शक्यता गृहीत धरून रोज नवनव्या मार्गदर्शक सूचना जारी होत आहे. असे रोज नवे मुद्दे जाहीर होतच राहातील. करोनाचे बरेसचे कल्पित भूत लोकांच्या, सरकारच्या आणि माध्यमांच्याही मानगुटीवरून कधी उतरणार? १४-१५ महिन्यांपूर्वी करोनाची पहिली लाट आली. त्यावर मात करण्यासाठी जगभर टाळेबंदीचा आसरा घेण्यात आला. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे समाजजीवन विस्कळीत झाले. उद्योगांचे चक्र मंदावले.
अनेक उद्योग आणि छोटे छोटे व्यवसाय तर कायमचे बंद पडले. काही कोटी लोक बेरोजगार झाले. करोनाचा बागुलबुवा उभा करण्यात अनेकांनी महत्वाची भूमिका पार पाडली. करोनाशी संबंधित रोज काहीतरी नवे पिल्लू सोडण्यात सर्व संबंधित अजूनही अग्रेसर आहेत. या विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी फक्त त्यांचीच आहे. या समजावरच सध्याच्या जगात माध्यमांचे अस्तित्व अवलंबून आहे. माध्यमांच्या ‘ब्रेकिंग’ न्यूजच्या हव्यासाने करोनाचा आभासी संसर्गच जास्त पसरला. बातम्या, तज्ज्ञांच्या मुलाखती, मत-मतांतरे याने लोकांना गुदमरवून टाकले. माध्यमे तरी काय करतील? त्यांची संख्या सध्या ‘दिन दोगुनी, रात चौगुनी’ या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धाही वाढली आहे. चोवीस तास कशाचा ना कशाचा गजर करणे त्यांनाही भाग आहे.
काल्पनिक करोना संकटाच्या प्रसिद्धीच्या अतिरेकाला वैतागून काही लोकांनी बातम्या बघणे आणि वाचणे बंद केल्याचे सांगितले जाते. पण अशा मूठभरांच्या फळीने माध्यमांचा माहितीचा समुद्र कितीसा आटणार? माध्यमांनी एखादा मुद्दा मांडला की सरकारवर त्या ‘गंभीर संकटा’ची दखल घेऊन उपाययोजना करण्याची जबाबदारी येऊन पडते. मग कुठे संपूर्ण टाळेबंदी, कुठे अंशतः टाळेबंदी, शाळा आणि महाविद्यालये बंद, त्यांच्या शिकवण्या बंद अशा अतार्किक उपायांची सरबत्ती समाजावर लादली जाते. एवढी सगळी यातायात करून निघालेला काय निष्कर्ष निघतो? उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार करोनाचा गजर सुरु झाल्यापासुन आजवर भारतात तीन कोटी लोकांना संसर्ग झाला. त्यापैकी पावणेदोन कोटी लोक बरे झाले आणि पावणेचार लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला.
त्याकाळात देशात करोनाशिवाय अन्य कुठल्याही कारणाने किंवा आजाराने मृत्यू झालेच नसणार असाच याचा अर्थ असेल का? या सामूहिक गदारोळामुळे लोक किती जागरूक झाले? उलट करोनाची दहशत मात्र पसरली. करोनामुळे १३० कोटींपैकी तीन कोटी लोक आजारी पडले पण दहशतीमुळे कोट्यवधी लोक मानसिकरीत्या आजारी पडले. जे बेरोजगार झाले ते मनाने पांगळे झाले. सततच्या अस्थिरतेमुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले. भवितव्याच्या चिंतेने काही जण निराशाग्रस्त झाले असे तज्ज्ञांचे मत व्यक्त होत आहे. असे जे परिणाम झाले आहेत आणि नंतर होणार आहेत त्याचा अंदाज तरी कोणाला आणि कसा येणार? एका पिढीचे वय २० ते २५ वर्ष मानले तर परिणामांची भीषणता लक्षात येण्यासाठी किमान एका पिढीचा काळ जावा लागेल. मानसशास्त्रज्ञांना कैक वर्ष अभ्यास करावा लागेल.
कदाचित पाश्चिमात्य राष्ट्रे याची दखल लवकर घेतीलही आणि त्यांची तयार आकडेवारी आपल्याकडच्या तज्ज्ञांना आयता आधार ठरेल. एवढे सगळे सायास करण्यापेक्षा माध्यमांवर करोना विषयापुरती बंदी घातली असती तर कदाचित टाळेबंदीसारख्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणारा उपाय टळणे शक्य झाले असते का? अलीकडच्या काळातील राज्यकारभार चालवणारी मंडळी ही एकूण समाजाच्या शहाणपणाचा प्रातिनिधिक गठ्ठा समजला जातो. पण त्या एकगठ्ठा शहाणपणाच्या नजरेतून हा साधा उपाय का निसटला असेल? माध्यमांवर टाळेबंदी लादली गेली असती तर दररोज लोकांना आपला चेहरा दाखवू पाहणारांचीच मात्र अडचण झाली असती. पण जनतेची फरफट मात्र नक्की टळली असती. अर्थात ही सुद्धा बराच वेळ टळून गेल्यावर आणि देशाच्या अर्थचक्राची गती यापुढील किमान एक दशकासाठी मंदावल्यानंतर सुचलेले कल्पनाचित्र आहे. पण करोनाच्या तिसर्या लाटेइतके ते निराधार भूत आहे असेही काहींना वाटू शकेल का?