Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगगोष्ट सांगेल यशाचा मार्ग

गोष्ट सांगेल यशाचा मार्ग

राष्ट्रीय शैक्षणिक धोऱणाची अंमलबजावणी देशभर सुरू झाली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने शिक्षण स्तराची पूनर्रचना केली आहे.त्या पुनर्रचनेत पायाभूत स्तराचा नव्याने समावेश केला आहे. त्या स्तरासाठी केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आऱाखडा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रापाठोपाठ महाराष्ट्र सरकारचा देखील राज्य अभ्यासक्रम आऱाखडा नुकताच जाहीर झेाला आहे. आऱाखडयात अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनाबददलचा विचार, दृष्टीकोन देण्यात आला आहे. त्यानुसार पायाभूत स्तरावर विद्यार्थ्यांच्यासाठी खेळातून शिकण्याच्या दृष्टीने गोष्ट हे एक महत्वाचे साधन सांगण्यात आले आहे. खरच गोष्टीने शिक्षणाची गुणवत्ता उंचावेल का? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर होय असेच येईल. खरंतर पायाभूत स्तरावर गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक होण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद भरण्यास मदत होईल. गोष्टीने विद्यार्थ्यांना शिकणे आनंददायी होण्याबरोबर ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. गोष्टीने विद्यार्थ्यांचे शिकण्यास आणि विद्यार्थ्यांचे संपादनस्तरही उंचावेल. आज घर आणि शाळांतून हरवलेली गोष्ट पुन्हा शाळेत आली तर चित्र बदललेले अनुभवास आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आराखडयात बरेच काही सांगितलेले आहे.. त्याचे स्वागत करायला हवे. त्यातील प्रत्येक घटकाचा सुक्ष्मतेने विचार करायला हवा.

खरतर आपल्याकडे गोष्ट म्हणजे केवळ आनंद असे चित्र आहे. अर्थात गोष्टीत आनंद आहेच पण त्यात शिकणे देखील सामावलेले आहे हे कसे नाकारणार.. गोष्टी सुक्ष्मतेने विचार केला तर गोष्ट शिक्षणातील काही उददीष्टांची परीपूर्ती करण्यासाठी निश्चित असा मार्ग आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, युनिसेफ, प्रथम बुक्स, स्टोरी विअर यांच्या संयुक्त विद्यमाने “गोष्टीचा शनिवार” कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. प्रत्येक शनिवारी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट आणि त्यावरील उपक्रम स्वरूपातील स्वाध्याय देण्यात आलेला होता. उपक्रम छोटा होता पण गेले अनेक वर्ष राज्य व राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात राज्याचा आलेख जेथे घसरतांना दिसतो आहे, त्या कौशल्यात यासारख्या उपक्रमाने वाढ होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर भाषिक कौशल्यांची वृध्दी आणि व्यक्तिमत्व विकास आणि समृध्दतेची वाटचाल गोष्टीमुळे घडणार आहे. या उपक्रमाची शिक्षणात गरज होती. त्यामुळे कोरोनाच्या काळात मुलांच्या मनावरील ताण आणि ऑनलाईन अभ्यासाचा जाणवणारे ओझे यामुळे कमी होण्यास मदत झाली होती. विद्यार्थ्यांची तणावातून मुक्ती झाली तरच शिक्षण आनंदाच्या वाटेने जाण्यास मदत होणार होती. गोष्टीमुळे पुन्हा एकदा आनंदाच्या वाटा उभ्या राहतील. त्या वाटा तुटविताना विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला बहर येईल. त्यामुळे राज्य अभ्यासक्रमात आराखडयात गोष्टीचा केलेला समावेश अधिक महत्वाचा वाटतो.

- Advertisement -

गोष्ट ही मानवी जीवनाच्या विकासात अत्यंत महत्वाची “गोष्ट”आहे. या गोष्टींनी अनेकाच्या आयुष्याला प्रकाशाच्या वाटा दाखविल्या आहेत. अनेकांच्या जीवनात समृध्दतेचा प्रवास घडविला. गोष्ट म्हणजे इतिहास असते. गोष्ट म्हणजे भविष्य आणि वर्तमानही. गोष्ट सांगत जाते मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास. माणसाला फुलविणा-या विचारांची पेरणी गोष्टीतून होत जाते. गोष्ट म्हणजे माणसांना प्रेरणा देणा-या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे दर्शन असते. गोष्टीतून उलगडत जाते अनेकदा अनेकांचे आय़ुष्य.. आणि घडत जाते जीवनाच्या वाटचालीचे मार्गदर्शन.. गोष्ट विचार पेरत जाते.. सत्वाचे दर्शन घडवत जाते.जीवनाला उभारी देते.. गांधी नावाच्या महापुरूषाच्या आय़ुष्यात हरिचंद्र तारामती यांच्या सत्यावरील प्रेमाची गोष्ट आली आणि सत्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नरेंद्र दत्त यांच्या जीवनात वर्डस्वथ यांची कविता आली त्यांचा विवेकानंदाच्या दिशेने प्रवासास आरंभ झाला. अरिस्टॉटल यांच्या कथांनी अनेकाच्या आयुष्याला आकार दिला.महात्मा फुले यांनाही पुस्तकाने वाट दाखवली.

लहानवयात घरात आजी आजोबा नावांची गोष्टींची विद्यापीठे होती. त्या विद्यापीठाच्या मुखी चीऊ काऊच्या गोष्टी होत्या. पंचतत्र, इसापसारखा शहाणपण पेरणा-या प्राण्याच्या गोष्टीतून मानवी समाज शहाणपणाचे दिशेने वाटचाल करू लागल्याचा इतिहास आणि वर्तमान देखील आहे. गोष्टींची पुस्तके पूर्वी शालेय अभ्यासक्रमात होती. छान छान गोष्टी नावांचे पुस्तक पूर्वी दुसरीत होते. त्यात रामायणातील प्रसंगाच्या केलेल्या गोष्टी होत्या. त्या गोष्टीनी राज्यातील लाखो विद्यार्थी ऐकती झाली होती. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होत होता. गोष्टींनी केवळ मनोरंजनच होते असे नाही, तर त्यातून शहाणपणाची पेरणी होत असते. त्यातून विवेकाच्या पातळीवर जाण्याचा प्रवास घडतो. गोष्टींमुळे मुलांच्या मनाला सृजनशीलतेची बीजे मिळतात. चिकित्सक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होत असते.

गोष्ट म्हणजे अभ्यासापासून दुरावने असे अलिकडे अनेकाना वाटते. सध्या शिक्षणाचा संदर्भ काही शिकण्यापेक्षा मार्क मिळवण्याशी जोडला जात आहे. शिक्षण ही स्पर्धा झाली आहे. त्यामुळे शिक्षण ताणतणावाचे शिक्षण झाले आहे. मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने गोष्ट, गाणे, बडबडगीते यांना कोणताच पर्याय नाही. गोष्ट म्हणजे बालकांसाठी अभ्यासच असतो हे कसे विसरता येईल. अभ्यासासाठी लागणारी पूरक माहिती गोष्टीतून मिळत असते. पाठातील लेखक, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक यांचा जीवनपट, त्यांची जडणघडण याची अतिरिक्त माहिती विविध गोष्टीच्या रूपाने मिळत जाते. गोष्टीतून पाठाच्या संबंधी आशयाच्याजवळ पोहचण्यास मदत होते. त्याचबरोबर कधीकधी पाठाच्या जन्मकथा देखील वाचनात आल्यावर त्या पाठाच्या संबंधाने विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण होण्यास मदतच होत असते. गोष्टीने नवनविन शब्द जाणून घेऊन शब्दसंपत्तीत वृध्दी होत असते. शब्दांचे उपयोजन करण्याची क्षमता उंचावते. भाषेच्या विविध लकबी, शैलीची समज वाढत जाण्यास मदत होते. परिसराची माहिती मिळते त्याचबरोबर जगाच्या संस्कृतीचा परिचय होत असतो. गोष्टीतून शहाणपणाची पेरणी होते. मुलांना विचार करण्यासाठी प्रेरित करण्याची शक्ती गोष्टीत सामावलेली असते. गोष्टीच्या माध्यमातून विचार मिळतो आणि त्याचप्रमाणे कल्पनेचे भरारी घेण्याची शक्ती मिळत असते. अनेकदा अर्धी गोष्टी वाचून त्या अनुभवाला मुले स्वतःच्या अनुभवाशी जोडून त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न करतात. त्या उपक्रमातून मुलांना कल्पनेची भरारी घेण्याची शक्ती मिळत असते. गोष्टीतून इतिहास आणि त्याकाळातील परीस्थिती, साधने, जीवनव्यवहार, लोकव्यवहार कळत असतो. त्यामुळे गोष्ट निश्चित परीवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी गोष्टीची निंतात गरज आहे.

सध्या समाजमाध्यमांचा प्रभाव वाढत आहे. घरात आलेल्या दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांनी मुलांच्या कल्पनेच्या भरारीची क्षमता आणि विचार प्रक्रिया कुंठीत केली आहे. अनेकदा त्यातील गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणा-या असतील असे नाही. त्याचबरोबर त्या वयाला अनुरूप काय आहे हे जाणून घडेलच असे नाही. जीवनाला प्रेरणा देणा-या त्या गोष्टी नसतील तर त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर होतो. पाहून कृती करणे, चिंतन करणे, विवेकाच्या दिशेने शहाणपणाची पाऊलवाट चालणे होईल असे नाही. त्यामुळे मुलांच्या शहाणपणासाठी गोष्टी अधिक उपयोगी ठरू शकतात. याकरीता पुस्तकांचा विचार अधिक गंभीरपणे करायला हवा. पुस्तक निवडताना वर्गांचा विचार करून, चित्रे, आशय देखील महत्वाचा आहे. त्या पुस्तकामध्ये शब्दांचा आकार, भाषा, चित्रे, प्रसंग या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. त्यांचा विचार सुक्ष्मतेने केलेला असतो.. श्रेणीबध्द विचार करीत पुस्तके मुलांच्या हाती पडणार असतील तर मुलानां निश्चित वाचनाची सवय जोडण्यासाठी मदत होणार आहे. गोष्टीच्या माध्यमातून अभ्यासपूरक काही मिळणार आहे. त्यामुळे किमान ज्यांच्या हाती पुस्तके मिळतील त्यांना तरी त्याचा लाभ होऊ शकेल. तसेच गोष्टी ऐकल्याने मुलांच्या विकासाला अधिक चालना मिळू शकणार आहे.

खरेतर पुस्तके वाचायची असतात. ती पुस्तके वाचतांना मुलांना कल्पक बनण्याच्या दृष्टीने सृजनशक्तीचा विकास व्हावा या करीता काही प्रश्न देखील दिले होते. प्रत्येक वयोगटाला अनुरूप ते प्रश्न होते. जसे पुस्तकातील कोणती चित्र तुम्हाला आवडली? असा प्रश्न आहे. प्रश्न सोपा असला तरी यामागे कार्यकारण भावाचा विचार आहे. आवडणारी चित्र पाहून मुलांचा अभिरूची जाणता येणार असतो. जिभेला चकवा देणा-या शब्दरचना विचारता येतात. त्या स्वरूपाच्या रचना देण्यात आलेल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांना त्या शोधणे, तयार करणे. त्या निमित्ताने चिंतन व मनन करणे घडेल. या गंमतीतून मुले भविष्यात काव्याच्या दिशेने आपला प्रवास करू शकतील. वरच्या वर्गातील गटाला घरी एखादी मिठाई करून पाहाण्याची कृती देण्यात आलेली होती. तसेच गोष्टीतील विद्यार्थ्यांनी जसे मशीन बनविले आहे त्या प्रमाणे एखाद मशिन बनून पाहा असे सूचविले होते. याकरीता विद्यार्थ्यांना आपला परिसर जाणून घेत विचार प्रक्रिया करावी लागणार आहे. या मशिनच्या निर्मितीत विज्ञान आहे. त्या मागे निश्चित काही तत्व आहे हे कसे विसरता येईल. गोष्टीतील उडणा-या रिक्षातून प्रवास करायला मिळाले तर तुमचे गाव कसे दिसेल याची कल्पना करा. यात शहर, गावातील नकाशा तयार करणे. शहारातील मुख्य ठिकाणे दाखविणे अपेक्षित आहे. यात भूगोल असले तरी नकाशाचे प्रमाण आहे. त्यात गणित शिकणार आहे. यामुळे विद्यार्थी किमान शहरात काय महत्त्तवाचे आहे, ते कोठे आहे हे दाखवतील. त्यातून त्यांना त्या संस्थाचा ओळख, स्थान समजणे, त्या निर्देशित करणे, त्यासाठीचे चिन्हे वापरणे घडेल. या सारखे कल्पक स्वाध्याय, कृती विद्यार्थ्यांना कल्पक बनवतील यात शंका नाही. विद्यार्थ्यांना पाठ आणि प्रश्नोत्तरे परीक्षेपुरते हवे असले तरी या सारख्या उपक्रमातून त्यांना आनंद मिळणार आहे. या कृती आनंदाने करतील.गोष्टीचा आशय आणि कृतीसाठी दिशा यातून त्याची नवी गोष्ट निर्माण होईल.कधीकधी गोष्टीतील अनुभवाची कविता देखील जन्म घेईल. मुलांचे भावविश्व आणि कल्पनेच्या भरारी मुळे मुले अधिक सृजनशील होतील हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे जी गोष्ट नेहमी वर्गात व्हायला हवी, ती होत नसेल तर तीची गरज निर्माण झाली आहे. आता अभ्यासक्रम आराखडयात सूचविण्यात आल्याने किमान ती सुरू होईल आणि सर्व शाळांमध्ये गोष्टी सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यत गोष्ट अधिक समृध्दपणे पोहचेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

राष्ट्रीय व राज्य संपादणूक सर्वेक्षणात राज्यातील विद्यार्थी जेथे मागे पडतात ते क्षेत्र प्रामुख्याने स्वतःचे विचाराचे प्रतिपादन, स्वमताची मांडणी, सर्जनशील लेखन, विचार करणे हे क्षेत्रात आहे. त्यात विद्यार्थ्यांची चूक काय? त्यांना त्या स्वरूपाचे अनुभव दिले नाही, त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिले नाही तर विद्यार्थी त्या क्षेत्रात यश कसे प्राप्त करणार हा खरा प्रश्न आहे. सध्याच्या परीक्षा आणि मार्काभोवती केंद्रित झालेल्या शिक्षणाच्या प्रक्रियेत या सारख्या गोष्टी म्हणजे वेळ वाया घालविणे आहे. त्यामुळे हा छोटा उपक्रमाने सध्याच्या केंद्र सरकारच्या विषय निहाय निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यास यामुळे हातभार लागेल. संस्काराच्या नावाखाली मुलावंर काही बळजबरीने लादण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे फलित निश्चित चांगले मिळत नाही.त्यामुळे हा मुक्त गोष्टी वाचनाचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याबरोबर समाज समृध्दतेसाठी देखील उपयोगी ठरणारा आहे.गोष्टी आल्या आहेत पण त्या वर्गावर्गात आणि घराघरात पोहचविण्यासाठी जाणीवपूर्वक नव्या मोहिमेची गरज आहे.गोष्टीची चळवळ व्हायला हवी..गोष्टी सांगणारी माणसं शिक्षणात यायला हवी..धडा शिकवल्याप्रमाणे गोष्ट मुलांच्या कानी पडली तर मुलांच्या शिक्षणातील आनंद हरवला जाण्याचा धोका आहे.त्यामुळे राज्य अभ्यासक्रमात आलेला गोष्टीचा विचार विद्यार्थ्यांना समृध्द करण्यासाठी वाट चालू लागेल तर शिक्षणाची गुणवत्ता निश्चित साधली जाईल यात शंका नाही.पण गोष्ट सांगण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील.गोष्ट वाचने, ऐकवणे, सांगणे या गोष्टी सहज सुलभ वाटत असल्या तरी ते वाटतात तितक्या सोप्या नाहीत.गोष्टीं सांगताना मुले रमली तरच ते कौशल्य प्राप्त झाले असे समजावे..पण इतक्या सहजतेने मुले रमत नाही…कारण सांगणा-याकडे ते कौशल्य नाही..म्हणून कौशल्यासाध्यतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे.

_ संदीप वाकचौरे

(लेखक- शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या