Saturday, May 4, 2024
Homeब्लॉगपेरीले जैसे बीज तैसे फल...

पेरीले जैसे बीज तैसे फल…

समाज परिवर्तनासाठी शिक्षण हे सर्वात महत्वाचे साधन आहे. शिक्षणात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. जगावरती पसरलेला अज्ञानाचा असलेला अंधकार नष्ट करण्याची शक्ती आणि हिम्मत शिक्षणात सामावलेली आहे. माणसांच्या मनातील षढरिपू नष्ट करण्यासाठीची पेरणी शिक्षणातून होत असते. शिक्षणातून माणूस घडतो आणि माणसं विचाराने उभी राहिली की देशाला प्रगतीकडे झेप घेण्यासाठी फारसा वेळ लागत नाही.

शिक्षणाच्या संबंधीने जगभरात जो विचार केला जातो तो म्हणजे शिक्षण हे देशातील मनुष्यबळाचे विकसन आणि संस्कारासाठी केली पेरणी असते. शिक्षण म्हणजे शहाणपणाची निर्मिती प्रक्रिया आहे. आपल्या समाजाला, देशाला जे काही मनुष्यबळ हवे असते त्याच्या सक्षमीकरणाकरीता, समाज मन घडविण्यासाठी, कौशल्यविकसनासाठी आपण शिक्षण देत असतो. शिक्षण हे समाजाला उन्नत बनविणारे सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे ज्या ज्या देशानी शिक्षणाचा गंभीर विचार केला त्यांना प्रगतीची उंच भरारी घेता आली आहे.

- Advertisement -

अवधान एकले देईजे…

वर्तमानात शिक्षणाची पेरणी जर आपण उन्नत विचारासाठी करीत असू तर त्यातून निश्चित काही उत्तम उगवावे ही अपेक्षा काही चुकीची नाही. अर्थात निसर्गाच्या नियमानुसार आपण जे काही पेरत असतो तेच उगवते. गुलाब लावले तर त्याला गुलाब येणार आणि धोतरा लावला तर धोतरा फुलणार हे अगदी निश्चित आहे. हा तर निसर्गाचा नियम आहे.. मग तोच नियम शिक्षणाच्या पेरणीला देखील लागू आहे. त्यामुळे वर्तमानात जे काही दिसते ते भूतकाळात केलेल्या पेरणीचे फलित असते. आपल्याला आपला भविष्यकाळ कसा हवा आहे? त्यासाठी वर्तमानातील शिक्षण प्रक्रियेतून पेरणीची गरज असते. त्यामुळे शिक्षणातून योग्य पेरणी व्हावी या करीता आपण अभ्यासक्रम, पाठयपुस्तकांची निर्मिती आणि शिक्षकांची नियुक्ती करीत असतो. मात्र हे सारे करताना जर फलित सुयोग्य नसेल तर पेरणी तरी चुकली किंवा बी तरी खराब होते असेच म्हणावे लागेल.

शिक्षण म्हणजे समाजमनावर संस्कार करणारी व्यवस्था आहे. शिक्षण जितके परिणामकारक असेल तितकी समाज व्यवस्था आपल्याला गतीमान झालेली पाहवयास मिळेल. त्यामुळे आपण शिक्षणाची ध्येयधोरणे कसे पुढे नेतो याला खूप महत्व आहे. प्रगत राष्ट्र म्हणून आपण ज्या देशाचा इतिहास समजून घेतो त्या त्या देशात शिक्षणाबददलचा विचार अत्यंत गंभीरपणे केला जातो. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य कसे हवे आहे हे पाहून धोरणकर्त्यांनी निर्णय घ्यायचे असतात. शिक्षणातून पेरणी चुकली तर समाज व राष्ट्राचे भविष्य अंधारात हे निश्चित आहे. त्यामुळे शिक्षण धोरणात सातत्य हवे असते. शिक्षण हा विचार राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया मानली जाते. असा विचार करणारी माणस ज्या भूमित असतात तेथे शिक्षण आणि राष्ट्र यांचे एक अतुट नाते निर्माण होत असते. त्यामुळे सरकार बदलले तरी त्यांच्या शैक्षणिक धोरणात फारसा बदल होताना दिसत नाही.

आधी स्वतःकडे पहा..

सत्ताधारी असू दे किंवा विरोधक यांचा अग्रक्रम समाज व राष्ट्र विकास असेल तर त्यातून धोरणाची आखणी व्हायला हवी. देशाचे शिक्षण धोरणात व्यापकता व देशाची गरज, समाजाचा विकास व उद्याचे भविष्य प्रतिबिंबीत होणारे असेल तर त्याचा स्वीकार करणे कोणालाही जड जात नाही. मात्र धोरणात एकांगीपणा आला तर तो स्वीकारणे घडत नाही उलट त्यातून संघर्ष उभा ठाकला जातो. त्यामुळे कोणत्याही देशाची धोरण प्रक्रिया ही राष्ट्र व समाजाच्या विकासासाठी होत असेल तर देशातील सर्व पक्षांचे एकमत होण्यास काय हरकत आहे? मात्र जेव्हा शिक्षणाबाबत एखादे राष्ट्र गांभिर्य दाखवत नाही, त्याकडे केवळ एक प्रक्रिया म्हणून पाहत राहते तेव्हा त्या देशाचे भविष्य देखील अंधारमय राहणार यात शंका नाही. शिक्षण हे राष्ट्र उन्नतीचा मार्ग आहे. येथे पेरलेली स्वप्न उद्याच्या तरूणाईत उगवणार आहे.

कोणत्याही देशातील शिक्षणाची प्रक्रिया ही भविष्याची पेरणी असते. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांना महाविद्यालयीन शिक्षणात दर सोमवारी विविध राष्ट्र पुरूषांच्या संदर्भाने होणा-या प्राचार्यांच्या व्य़ाख्यानाने प्रेरणा मिळाली. त्यातून स्वतःची जडणघडण करण्याची दिशा निश्चित केली.त्याचा परीणाम या देशाला अत्यंत बुध्दिवान आणि निरपेक्ष असे वैज्ञानिक आणि राष्ट्रपती मिळाले. हरीश्चंद्र, तारामती यांच्या कथेने या देशाला महात्मा गांधी मिळाले, वर्डस्वथ यांच्या कवितेने या देशाला विवेकानंद मिळाले, महात्मा फुले यांच्या जीवनावरती देखील एका पुस्तकाचा झालेला परिणाम. पुस्तके इतके परिणाम करीत असतात. ही पुस्तके वाचताना मस्तकाला शक्ती मिळत असते. शहाणपण येत असते. पुस्तके तर शिक्षण प्रक्रियेत सातत्याने वाचली जातात. त्या शहाणपणाची शक्तीसाठी लागणारे वाचन व लेखनाचे कौशल्य शिक्षणातून मिळत असते. वाचनाने माणूस घडत असेल तर काय वाचायचे ? कसे वाचायचे ? कसा विचार करायचा ? याची विवेकशीलता देखील शिक्षणातून पेरली जाते. शिक्षणातून होणा-या विचाराच्या पेरणीतून भविष्याचा अंधकार नष्ट करणे घडणार आहे.शिक्षण काय करते असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर असते शिक्षण समाज, राष्ट्र आणि माणसांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट करीत असते.

घर हीच शाळा…

शिक्षणावरील होणारा वर्तमानातील खर्च हा देशाच्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते असे मानले जाते. त्यामुळे शिक्षणाची पेरणी किती महत्वाची आहे हे सहजपणे लक्षात येईल. आपल्या देशात एक डॉक्टर चुकला तर एक रूग्न दगावेल. एक अभियंता चुकला तर एखादी इमारत, पुल कोसळेल पण वर्गातील एक शिक्षक चुकल तर चाळीस पन्नास मुलांचे आय़ुष्य चुकते. त्या मुलांचे आय़ुष्य चुकणे म्हणजे तितके कुटुंबाच्या जीवनाचा शहाणपणाचा प्रवास थांबणार आहे. त्यातून त्यांच्या आय़ुष्याची राखरांगोळी ठरलेली आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेशिवाय या देशात एक जरी दाऊद उभा राहिला तरी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा धोका पत्कारायचा नसेल तर आपण शिक्षणाचा अधिक गंभीर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे राष्ट्र निर्मितीचा संस्कार आहे.

शिक्षण हे माणसांच्या जीवनाची जडणघडण आहे. त्यामुळे शिक्षणावरील खर्च ही गुंतवणूक ठरते. ती गुंतवणूक जितकी चांगली होईल तितक्या मोठया प्रमाणावर देशाचे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या संबंधाने देशात होणारी पेरणी महत्वाची आहे. त्या दिशेने प्रवास घडविण्यासाठी आपणच जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न आज केले नाही तर उद्या आपल्याला फार चांगले दिवस अनुभवता येणार नाही.

मैदानांची वाट हवी..

शिक्षण ही संस्काराची पेरणी असते. आपल्या असलेल्या परंपरा, रूढी, प्रथा यांच्या पलिकडे जात विवेकाने वर्तन करण्यासाठी शिक्षणातून मने घडवायची असतात. ती जितकी उत्तमतेने घडविली जातीत तितका समाज वेगाने पुढे जाणार आहे. गिलबर्थ या अमेरिकन विचारवंताने म्हटले आहे की, “शिक्षण हे गरीबी नष्ट करण्याचे एकमवे प्रभावी माध्यम आहे”. त्यामुळे आपण शिक्षणातील पेरणी बाबत अधिक गंभीर असायला हवे. आज आपण त्या संदर्भाने गांभीर्य दाखविले नाही तर आपल्यासाठीचा उद्याचा सूर्य देखील अंधार घेऊनच येणारा ठरणारा आहे. त्यामुळे शिक्षणात काम करणा-या प्रत्येक माणसांने आपण राष्ट्र घडवितो या दिशेने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

शिक्षण हे भ्रष्टाचार मुक्त असेल आणि तेथे शुध्द बीजांची पेरणी केली गेली, तेथील माणसं व्देषापासून मुक्त आणि निर्मळ अंतकरणाची असतील तर त्यांच्याकडून होणारी पेरणी देखील तितकीच उत्तम असणार यात शंका नाही. त्यामुळे आपण शिक्षणात किती निर्मळ विचाराची पेरणी करतो यावरच समाज मनाची जडणघडण पहावयास मिळेल. शिक्षण भ्रष्टाचारापासून दूर राहिले तर समाज व राष्ट्र देखील भ्रष्टाचार मुक्त पहाण्यास मिळेल. शिक्षणाची प्रक्रिया केवळ सांगून विकसित होत नाही. त्याकरीता तेथे त्या दिशेचा प्रवास सुरू ठेवावा लागतो. पेरणी करावी लागते. बीयांनाना गाडून घ्यावे लागते.

तुम्ही फक्त इतकेच करा..!

त्याची पेरणी वरवर झाली तर जसे आपले बीयाने वाया जाते आणि फार काही उगवत नाही त्याप्रमाणे वर्गातील विचाराची पेरणी किती खोलवर जाऊन होते त्यावरच उगवणे अवंलबून असणार आहे.त्यामुळे संत ज्ञानेश्वरानी ज्ञानेश्वरीतील ओवीचा विचार केला तर आपल्याला सहजतेने हे लक्षात य़ेईल.माऊली म्हणतात की,आपण जसे बीज पेरतो त्याप्रमाणे फळ मिळणार आहे.बी आणि फळ यांचे एक नाते आहे.त्यातील कार्यकारण भाव आहे हे आपण जाणले.तरच जीवनात देखील तसेच घडणार आहे यात शंका नाही.शिक्षणातून चांगले पेरले तर चांगले उगविणार,जे पेरू तेच उगवते हा नियम लक्षात ठेऊन वर्तमानात चांगल्याची पेरणीची करण्याची गरज आहे..हे लक्षात घेऊन पेरणी करत राहूया..

जैसे जे बीज पेरावे

फल तसेच मग पावावे

हे कार्यकारण आघवे

जाण अंतरी 4/74

_संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे)

आत्मनिर्भयतेच्या दिशेने..

- Advertisment -

ताज्या बातम्या