नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भरणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.
या पाहणीसाठी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ . शैलेश पगारिया, अतुल बोकरीया, प्रदीप पाटील,लेशपाल जवळगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
One Nation One Election : ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकावर लोकसभेत मतदान; बाजूने आणि विरोधात किती मते?
शरद पवार यांनी संमेलनस्थळावर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तलकटोरा स्टेडियममध्ये किती लोक येऊ शकतात, त्यांची बसण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी होईल याची पाहणी त्यांनी केली. पुस्तक प्रदर्शन स्थळ, कवीकट्टा आदींची स्थळ पाहणी त्यांनी केली तसेच संमेलन भव्य दिव्य होण्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद या संमेलनासाठी अपेक्षित आहे. महाराष्ट्रासह देशभरातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहतील, तसेच साहित्यप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. त्या अनुषंगाने सुव्यवस्थित नियोजन आणि सुरक्षेच्या बाबतीत काटेकोर उपाययोजना कराव्यात असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
संमेलनाच्या तीन दिवसांत साहित्यिक परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पुस्तक विक्रीसाठीही भव्य दालन इथे असणार आहे. या तयारीचीही माहिती शरद पवार यांनी यावेळी घेतली.
महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे. ही ओळख निर्माण होण्यात मराठी वाङ्मयाचा मोठा वाटा आहे. भारताचे वैचारिक प्रतिनिधित्व करण्यात महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या माणसांनी तर साहित्यात आणि देशाच्या जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल, यादृष्टीने प्रयत्न या संमेलनाच्या अनुषंगाने करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
संमेलनाचे सुसज्ज आयोजन व व्यवस्थापनासाठी सुसज्ज टीम, तांत्रिक सुविधा आणि उपस्थित साहित्य रसिकांच्या दृष्टीने हे संमेलन स्मरणीय कसे होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून हे संमेलन मराठी साहित्याचा अनोखा सोहळा ठरणार असून त्यातून मराठी साहित्य आणि सांस्कृतिक बंध विस्तारेल, असे सरहद संस्थेचे संस्थापक साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी यावेळी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा