मुंबई । Mumbai
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. विशेषतः सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
मुंबईतील अॅक्वा लाईन मेट्रो स्टेशनवर पाणी साचल्याने स्थानिक प्रशासनावर आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी खुद्द मेट्रो स्टेशनला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आणि सरकारवर गंभीर आरोप केले.
अॅक्वा लाईन मेट्रो स्टेशनच्या अद्याप सुरू असलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले, “जर मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे, तर उद्घाटन कोणत्या आधारावर करण्यात आलं?” त्यांनी दादरच्या हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओही ट्विटरवरून शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
ठाकरेंनी असा दावा केला की, “आमच्या सरकारच्या काळात चार वर्षांपूर्वी हिंदमाता परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, आज भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने कोणतीही पावसाळी तयारी केली नाही. एकाच पावसात संपूर्ण मुंबईला बुडवून टाकल्याचं वास्तव समोर आलं आहे.”
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “जर पाऊस १५ दिवस आधी आला, तर काही अडचणी येणं साहजिक आहे. आपण १० जूननंतर पावसाची तयारी करत असतो. मात्र, यावेळी मान्सूनने लवकर हजेरी लावली.”
शिंदे म्हणाले, “मी स्वतः कंट्रोल रूममधून सर्व भागांवर नजर ठेवतोय. अनेक ठिकाणी आता पाणी साचलेलं नाही. मुख्यमंत्री देखील सातत्याने यंत्रणांशी संपर्कात आहेत. सर्व यंत्रणा सतर्क आहेत आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.”
दरम्यान, माहिम परिसरात म्हाडाची एक इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने तिचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून सततच्या पावसामुळे थोडी गैरसोय झाली असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.
या पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचणं, रस्ते जलमय होणं, वाहतुकीवर परिणाम होणं या सर्व घटना प्रशासनाच्या अपयशाची साक्ष देत असल्याचं विरोधकांचं मत आहे. दुसरीकडे, शासन आणि प्रशासन मात्र पावसाळ्याच्या अगोदरच्याच सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसाला जबाबदार धरत आहेत.
मुंबईत पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ निसर्गाच्या लहरीपणामुळे की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र, नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीची स्थिती, आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच, राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा मुंबईकरांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे.