नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘फिक्सिंग’ झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर एकतर मौन बाळगले किंवा आक्रमक वृत्तीने उत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण आता केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त करत खासदार राहुल गांधी यांचा आरोप फेटाळून लावला आहे.
निवडणुक आयोगाने काय म्हंटले?
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. तसेच निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मदतारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली आहे. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात सर्व तथ्ये स्पष्ट केली आहेत आणि ती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. तथापि, वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून असे मुद्दे पुन्हा पुन्हा उपस्थित केले जात असल्याचे निवडणुक आयोगाने सुनावले आहे.
कोणाकडूनही पसरवलेली कोणतीही चुकीची माहिती ही कायद्याचा अनादर करण्याचेच द्योतक आहे. तसेच, विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी ही बाब आहे. अशा चुकीच्या माहितीमुळे निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचते. मतदारांनी प्रतिकूल निर्णय दिल्यावर निवडणूक आयोगाशी हातमिळवणी झाली आहे, असे सांगून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पूर्णपणे तथ्यहीन आहे, असेही निवडणुक आयोगाने नमूद केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची संख्या अचानक वाढली. तसेच निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. हा दावादेखील निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. निवडणुकीसाठीचे उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या एजंट्सच्या उपस्थितीत मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. काँग्रेस तसेच काँग्रेसच्या अधिकृत एजंट्सनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफिसर तसेच निवडणूक निरक्षकांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नव्हती, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
राहुल गांधींनी थेट आकडेवारीच दिली
दरम्यान, राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा दावा करताना काही आकडेवारी सादर केली आहे. थेट आकडेवारीच सादर केल्यामुळे राहुल गांधीच्या आरोपांना वजन प्राप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या 8.98 कोटी होती. पाच वर्षांनंतर, मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 9.29 कोटी झाली. फक्त पाच महिन्यांनंतर म्हणजेच नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या 9.70 कोटी झाली. म्हणजेच, पाच वर्षांत मतदारांची 31 लाखांची किरकोळ वाढ झाली तर, अवघ्या पाच महिन्यांत 41 लाखांची मोठी वाढ झाली. मतदारांची संख्या 9.70 कोटींपर्यंत पोहोचणे अविश्वसनीय आहे, कारण खुद्द सरकारचीच आकडेवारी सांगते की, महाराष्ट्राची एकूण प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा