मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २० मे रोजी मतदान (Polling) सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले होते. याविरोधात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या दिवशी पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं होतं? याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आली होती.
त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरेंवर कोणती कारवाई केली जाऊ शकते?
निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता असते. राज्य निवडणूक आयोग त्या व्यक्तीवर निवडणुकीच्या काळात प्रचारबंदीसारखे निर्बंध लागू करु शकते. जर फौजदारी गुन्हा दाखल झाला तर खटला देखील चालवला जाऊ शकतो.