कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
शेतीची वीज बिले वसुलीच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेतीचा विज पुरवठा खंडित करण्यासाठी थेट विद्युत रोहित्रे बंद करण्याची मोहीम सुरु केल्याने हातातोंडाशी आलेली रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कंपनीच्या या कारवाईमुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून ही मोहीम तातडीने थांबवून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
वीज वितरण कंपनीने किमान दोन-तीन आठवडे पूर्वसूचना देऊन रोहित्रावरील विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेणे आवश्यक होते. वीज नियामक आयोगाचे तसे आदेश आहेत. याशिवाय शेतकर्यांच्या शेतीपंपांची वीज तोडू नये असा न्यायालयाचाही आदेश असताना महावितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
एकतर अतिवृष्टीने खरीप पिकांना फटका बसून शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यातच आता रब्बी पिके शेवटच्या पाण्यावर आलेली आहेत. विहिरींना पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नाही. उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे.
सध्या कोणत्याच शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. कांदा अक्षरशः चार ते पाच रुपये किलोने विकला जात आहे. कांदा उत्पादनासाठी होणार्या खर्चाच्या मोबदल्यात 20 टक्केही रक्कम शेतकर्यांच्या हातात मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. भाजीपाल्याला योग्य दर मिळत नाही. अतिवृष्टीमुळे उसाच्या उत्पन्नात 50 टक्के घट झालेली आहे. पिकविमा व अतिवृष्टीची मदत अद्याप शेतकर्यांना मिळालेली नाही.
नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाने शेतकरी वर्ग अक्षरशः भरडला जात असतानाच आता वीज वितरण कंपनीने थेट विद्युत रोहित्रांवरील वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकर्यांची ही अवस्था विचारात घेऊन विद्युत रोहित्रांवरील विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तातडीने थांबविणेसाठी राज्य वीज वितरण कंपनीला आपले निर्देश व्हावेत, अशीही मागणी श्री. परजणे यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.