चांदा|वार्ताहर|Chanda
नेवासा तालुक्यातील बर्हाणपूर येथील विज वितरण कंपनीच्या मुख्य वाहिनीचे वाकलेले खांब, गावात ठिकठिकाणी लोंबकळलेल्या तारा यामुळे नागरीकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी सांगूनही विजवितरण कंपनी याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत असून ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
बर्हाणपूर शेतीसाठी येणार्या मुख्य विद्युत वाहिनीचे खांब अनेक ठिकाणी गेली वर्षभरापासून वाकलेले आहेत. त्यामुळे अनेक रोहित्राला धोका निर्माण झाला आहे. एक खांब जरी पडला तरी त्यावर असलेले दोन-तीन रोहित्रही कोसळू शकतात अशी भयानक स्थिती आहे. ज्यांच्या शेतातून मेन लाईन गेली आहे त्यांच्या शेतात विद्युत पुरवठा चालू असताना अनेकदा तारांचे घर्षण होऊन जाळ पडतो.
त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यास शेतकरी वर्ग घाबरत आहे. या तारांच्या घर्षणाने रोहित्रातही अनेकदा बिघाड होत आहे. त्यामुळे अनेक रोहित्रातील वायर जळाल्या असून त्यांचीही दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अशीच परिस्थिती गावातही आहे. गावातील गल्लीबोळात उभे असलेल्या खांबांवरील तारा जुन्या झाल्याने खाली लोंबकळल्या आहे. नागरिकांचा सहज हात लागेल एवढ्या खाली तारा लोंबकळल्या असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने धोका जास्त वाढला आहे तालुक्यात पावसाळ्यापुर्वी अनेक ठिकाणी दुरुस्ती झाल्या मात्र बर्हाणपुर ग्रामपंचायतीने अनेकदा दुरूस्तीसाठी पत्रव्यवहार करूनही त्याकडे विजवितरणने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सरपंच सौ छाया अशोकराव चव्हाण व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश संघटक अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. येत्या आठवड्यात यात तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ, शेतकरी यांच्यासह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री. चव्हाण यांनी दिला आहे.
बर्हाणपूर वाडीवस्तीवर अजूनही सिंगल फेज चालू नाही. याबाबतही विजवितरणला ग्रामपंचायत मिटिंग ठराव पत्रव्यवहार केलेला आहे मात्र याबाबतही विज वितरण दुर्लक्षच करत असून आता यासाठी आपण गावातील सर्व प्रमुख पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ नामदार शंकरराव गडाख यांना भेटणार असून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती करणार आहोत
– अशोकराव चव्हाण, प्रदेश संघटक छावा क्रांतीवीर सेना.