नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इथिओपिया देशाच्या हेली गुब्बी प्रदेशात २३ नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. जवळजवळ १०,००० वर्षांत पहिल्यांदाच इथिओपियामध्ये अशी घटना घडली. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डायऑक्साइडचा मोठा लोट आकाशात पसरला. स्फोटानंतर निर्माण झालेली राख प्रति तास १२० किमी इतक्या वेगाने भारतापर्यंत पोहोचली आहे. हीच राख आता भारतातील दिल्ली आणि मुंबईत पोहोचली आहे. यासह हे राखेचे कण सोमवारी संध्याकाळी गुजरात आणि राजस्थानमध्येही दाखल झाले आहे. इंडियामेटस्काय वेदरच्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या राखेचे ढग सोमवारी (२४ नोव्हेंबर) रात्री पश्चिम भारतातील काही भागांमध्ये पोहोचले आणि उत्तरेकडील राज्याच्या दिशेने जात आहेत.
इथिओपियाच्या हेली गुब्बी प्रदेशात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा भारतावर परिणाम झाला आहे. भारताच्या दिल्ली, मुंबईच्या अवकाशात ही राख पसरल्यामुळे भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सर्व विमान कंपन्यांना तातडीची सूचना जारी केली, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ज्वालामुखीची राख असलेल्या क्षेत्रांवरून उड्डाणे टाळावीत.
डीजीसीएने काय निर्देश जारी केले?
राखेचे हे ढग राजस्थानमधून पुढे दिल्ली आणि नंतर हिमालयाच्या दिशेने सरकण्याचा अंदाज अवकाश निरीक्षण केंद्रांकडून वर्तवण्यात आला आहे. हे राखेचे ढग ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने प्रवास करत भारतात दाखल झाले आहेत. इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक आता हळूहळू कमी होत असला, तरी हे राखेचे ढग मात्र अवकाशात अनेक समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ओमन आणि येमेनमधून प्रवास करत हे ढग भारतात येऊन धडकले आहेत. या देशांपर्माणेच भारतातदेखील सर्व विमान कंपन्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
विमानतळ पातळीवर अतिरिक्त सुरक्षा उपाय देखील लागू करण्यात आले आहेत. ज्या भागात राख विमानापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धावपट्टी, टॅक्सीवे आणि हवाई क्षेत्राची विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास, ऑपरेशन्स निलंबित किंवा मर्यादित केले जाऊ शकतात. हवेतील राखेची हालचाल कधीही दिशा बदलू शकते, त्यामुळे विमान कंपन्यांना उपग्रह प्रतिमा, हवामान डेटा, NOTAM, ASHTAM आणि ज्वालामुखीय राख सल्लागारांचे 24/7 निरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवासी वा लष्करी विमानांच्या उड्डाणांवेळी सतर्कतेच्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश DGCA ने दिले आहेत. राखेचे ढग पसरलेल्या भागातून किंवा उंचीवरून विमानांचे उड्डाण करू नये, असे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. तसेच, विमानांचे मार्ग, विमानातील इंधनाचा साठा, केबिनमधील धूर वा धुळीचा शिरकाव, इंजिनची कार्यक्षमता या बाबींची योग्य ती काळजी घेण्याचेही निर्देश दिले आहेत.
ज्वालामुखीच्या राखेत घातक पदार्थ
ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर राखेचे ढग आकाशात पसरले आहे. हे ढग प्रति तास १०० ते १२० किमी इतक्या वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकले. मिळालेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीच्या राखेत सल्फर डायऑक्साईड, काच आणि दगडाचे छोटे कण असतात.
भारतात कुठे राखेचे ढग?
इंडियामेटस्काय वेदरने याबद्दल म्हटले आहे की, राखेच्या ढगाने गुजरात (भारताच्या पश्चिमेकडून) मधून भारतात प्रवेश केला. रात्री १० वाजता राजस्थान, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा आणि पंजाबच्या दिशेने हे ढग सरकले आणि त्याने हिमालय आणि इतर क्षेत्रातही प्रवेश केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





