मनमाड | प्रतिनिधी Manmad
येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात बुधवारी मोठी घसरण झाली असून कांद्याला प्रती क्विंटल कमीतकमी ५०० सरासरी ९०० रुपये भाव मिळाला. कांदा पीकविण्यासाठी प्रतीकिलो १० ते १२ रुपये खर्च येत असताना जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात सध्या कांद्याला प्रती किलो ५ ते ९ रुपये इतकाच भाव मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकर्यांना पडला आहे.
कांदा हे जिल्ह्यातील नगदी पिक मानले जात असल्याने शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. यंदाही हजारो हेटरवर कांद्याची लागवड करण्यात आली मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन, कापूस या पिकांसोबत कांद्याला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकर्यानी कांदा काढून ठेवला होता. काहींचा कांदा काढणीला आला होता मात्र अचानक परतीच्या पावसाने सर्वच पिके उध्वस्त झाली.
सर्वात जास्त नुकसान कांद्याचे झाले.
भाव कमी मिळत असल्याचे पाहून पुढे भाव वाढतील या आशेवर हजारो शेतकर्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र अतिवृष्टी आणि बदलत्या वातावरणामुळे कांदा खराब होऊन सडू लागला. एकीकडे भाव नाही दुसरीकडे साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दिवाळी तोंडावर आल्यामुळे कांदा विकून सण साजरा करण्याची तयारी शेतकरी करत होता. मात्र कांद्याला इतका कमी भाव मिळत आहे की त्यातून वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.
कोणतीही वस्तू उत्पादन करतांना त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार कारखानदार,व्यापारी यांना आहे तर मग अथक कष्ट करून पिकविलेल्या कांद्यासह इतर शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला का नाही? कांद्याला किमान प्रती क्विंटल २२०० ते २५०० रुपये मिळेल अशी व्यवस्था सरकारने करावी.
अर्जुन गायकवाड, शेतकरी




