श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
केंद्र शासनाने संमत केलेल्या नविन कृषी धोरणाविरुध्द नवी दिल्ली येथे शेतकर्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास
तसेच मंगळवार 8 डिसेंबर रोजीच्या भारत बंदला माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी दिली.
श्री. धुमाळ यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या नविन कृषी धोरणाबाबत देशातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या कायद्यातील तरतुदीमुळे शेतविक्रीत मक्तेदारी तयार होईल. बाजार समितीनजिक खाजगी कंपन्यांना विपणनाची परवानगी दिल्यास शेतकर्यांना हमीभाव मिळणार नाही. करार शेतीमुळे शेती व्यवसाय भांडवलदारांच्या हाती जाईल.
शेतमालाला शाश्वत भाव मिळण्यास संरक्षण राहणार नाही. तसेच साठेबाजी अनियंत्रित होऊन शेतमालाचे भाव पाडले जातील. या सगळ्या बाबी शेतकरी विरोधी असून सदरच्या धोरणात बदल होण्याची आवश्यकता आहे.
या कायद्यास विरोध करण्यासाठी शेतकरी गेल्या आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. यासंदर्भात माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीची बैठक घेण्यात आली.
त्यात सविस्तर चर्चा होऊन शेतकर्यांच्या आंदोलनास तसेच मंगळवार 8 डिसेंबर रोजीच्या भारत बंदला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ लोकसेवा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.