श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे अनेक दिवसांपासून दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आठ दिवसांत साफ न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कडीत पाणी योजनेतून फत्त्याबाद येथे पाणीपुरवठा केला जातो. पिण्याचे पाणी असलेली टाकी व त्यातील गाळ अनेक वर्षांपासून साफ केलेली नाही. टाकी न धुतल्याने टाकीत जंतू व शेवाळ तयार झाले आहे. तसेच टाकीमध्ये गाळ साचलेला असल्यामुळे पिण्याचे पाणी अत्यंत खराब येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील पाणीपुरवठा करताना चेंबरमधील व्हॉल्व्ह लिकेज असल्यामुळे त्यात घाण पाणी साचते व तेच पाणी नागरिकांना देण्यात येते. फत्त्याबाद गावात दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. याकडे ग्रामपंचायत व आरोग्य खात्याचे लक्ष नाही. ग्रामसभेला ठराव करून सुद्धा कारवाई होत नाही.
फत्त्याबाद येथील ओहोळ वस्ती येथे दलित वस्ती सुधार योजना 2020 ते 21 अंतर्गत सहा लाख रुपये खर्चाचा पाणी पुरवठा व आरओ प्लॅन्ट बसवण्यात आले होते. तो प्लांट नऊ ते दहा महिन्यांपासून बंद आहे.
गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी आठ दिवसांत साफ केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयश्री ओहोळ, व्हा. चेअरमन चांगदेव बेलकर, सोसायटीचे संचालक शंकर लबडे, राहुल आठरे, इसाक पटेल, सुरेश ओहोळ, कदीर पटेल, बबन लबडे यांनी दिला आहे.