पाचेगाव फाटा | Pachegav
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांना दुसर्यांदा केंद्राने रासायनिक खत दर वाढीचा झटका दिला आहे. यावर्षी ऊस दरात फक्त दीडशे रुपये वाढ झाली, तर पोटॅश खताचे प्रति एक बॅग दरात 275 रुपयांनी वाढ झाली आहे. एकाच हंगामात दुसर्यांदा खताचे दर वाढल्याने शेतकर्यांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहे.
रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप सध्या जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. शेतकर्यांना पीएम किसान योजनेतून वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. पण, यावर्षीच्या खरीप हंगामात केंद्राने रासायनिक खतांच्या दरात वाढ करून शेतकर्यांना झटका दिला आहे. यावर्षी ऊस दरात फक्त दीडशे रुपये वाढ झाली, तर पोटॅश खताची एका पोत्याच्या दरात 275 रुपयांची वाढ केली आहे. एकाच हंगामात दसर्यांदा खताचे दर वाढल्याने शेतकर्यांचा ताळमेळ बिघडला आहे.
यांच्या अगोदर देखील रशिया-युक्रेन युद्ध, केंद्राचे धोरण, खत निर्यातीत मुख्य देशांनी आखडता हात आणि इंधनाचे वाढलेलें दर यामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. दरवाडीने मात्र फळबाग, इतर शेती उत्पादकांचे धाबे दणाणले आहे.खरीप हंगामातील पिकांसाठी उपयुक्त खते प्रामुख्याने महागली असल्याने ही दरवाढ शेती उद्योगाला भविष्यात उद्ध्वस्त करणारी असल्याची भीती सध्या शेतकरी वर्गातून होत आहे.
रासायनिक खतनिर्मिती करणाच्या खत कंपन्यांनी प्रत्येक रासायनिक खते व औषधांची लिकिंग सुरु केल्याने विक्रतेसह जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लिंकिंगशिवाय रासायनिक खत न देणार्या कंपन्यांवर कारवाई काण्यात कृषी विभाग उदासीन असल्याने विक्रेते व शेतकर्यांना मध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. खतांची दरवाढ करुनही कंपन्यांच्या पोट भरत नसल्याने त्यांनी विशिष्ट सायनिक खतावर महागड्या खतांचे लिकिंग सुरू केले आहे. जिल्ह्यात सध्या नामांकित खतांची रॅक दखल होत आहे, परंतु या खतांच्या बरोबर इतर खते लिकिंग असल्याने विक्रेते ही खते उचलत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्यात शेतकर्यांना लागणार्या खतां बरोबर इतर खते घेण्यास कंपन्यांनी विक्रत्यासह शेतकर्यांना सक्तीचे केल्यामुळे शेतकरी देखील रासायनिक खताचा वापर कमी करताना दिसत आहे.
त्यात सव्वादहा टक्के उसाच्या रिकव्हरी साठी मागील 2024-25 मध्ये 3400 रुपये एफआरपी केंद्र सरकरने दिली होती. आणि आता चालू हंगामात म्हणजे 2025-26 या काळात 3550 रुपये केले आहे.म्हणजे शेतकर्यांच्या उसाला फक्त प्रति टन 150 दरवाढ दिली गेली शिवाय यातून तोड आणि वाहतूक जाऊन वेगवेगळ्या हिशेबाने वजा होऊन शेतकर्यांच्या पदरी दर मिळणार.थोडक्यात 10.25 टक्के रिकव्हरीच्या पुढे 1 टक्के रिकव्हरीला प्रति टन फक्त 30 रुपये 46 पैसे वाढवून मिळण्याची तरतूद गेली केल्याच्या सांगण्यात येत आहे. इतर पिकांना देखील हमीभाव जाहीर केले असताना कोणताही शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. मग शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव जैसे थे आणि शेती निगडित लागणारे सगळ्यांचे भाव गगनाला भिडुन द्यायचे काम सरकारने केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
त्यात सरकारने जसे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली,तसे त्याच्यावरील अनुदानात देखील वाढ करावी. जेणेकरून रासायनिक खतांच्या किंमती स्थिर राहून शेतकर्यांना दिलासा मिळेल. कोरोना काळात रासायनिक खतांवर अनुदान होते, ते अनुदान कमी करण्यात आले.त्यामुळे जसे खतांच्या किमतीत वाढ केली तशी अनुदानात वाढ करण्यात यावे. सगळ्यात स्वस्त मिळणार्या युरियाचा फ़क्त भाव स्थिर आहे. पण जिल्ह्यात बर्याच ठिकाणी हा युरिया उपलब्ध नाही.
खते | जुना दर | नवीन दर | वाढ टक्के |
| 10:26:26 | 1725 | 1850 | 07.25 |
| 15:15:15 | 1470 | 1650 | 12.24 |
| 12:32:16 | 1720 | 1850 | 07.56 |
| 9:24:24 | 1900 | 2100 | 10.53 |
11:30:14 | 1800 | 1975 | 09.72 |
| पोटॅश | 1525 | 1800 | 18.03 |
| 16:16:16 | 1450 | 1600 | 10.34 |
| 24:24:0 | 1850 | 1900 | 02.70 |




