नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
ईशान्य भारतातील (Northeastern States) आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे महापूर (Flash Floods) आणि भूस्खलन झाल्याने या राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीनही राज्यांमध्ये दोन दिवसांत २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक पातळीवर जनजीवन विस्कळीत झाले असून, काही भागांचा संपर्क तुटला आहे. त्यानंतर प्रशासन उच्च पातळीवर सतर्क झाले असून, मदत आण बचावकार्य सुरु आहे.
मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) या घटनेमुळे आसाममध्ये भूस्खलन आणि पूरामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात महामार्ग १३ वर भूस्खलनात एक कार खोल दरीत कोसळल्याने या अपघातात दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच मिझोरमच्या सेरछिपमध्ये १३ घरे कोसळली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Assam: Karimganj faces severe disaster after three days of relentless rain caused widespread flooding. The rivers are flowing above danger levels. Public roads, including the National Highway, are submerged due to artificial flooding, leaving many areas across the district… pic.twitter.com/3LmDqdjMaR
— IANS (@ians_india) May 31, 2025
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक नुकसान
आसाम आणि अरुणाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे संपूर्ण घरे आणि वाहने भूस्खलनात गेली असून, पुराच्या पाण्यामुळे हजारो रहिवासी विस्थापित झाले आहेत. तसेच आसामच्या कामरूप महानगर जिल्ह्यात, गुवाहाटीच्या बोंडा भागात झालेल्या भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
गुवाहाटीमध्ये सर्वाधिक पाऊस
गुवाहाटीत एकाच दिवसात १११ मिमी पाऊस पडला असल्याने ६७ वर्षांचा जुना विक्रम मोडला गेला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ईशान्येकडील विविध भागांसाठी लाल आणि नारिंगी अलर्ट जारी केले आहेत. तसेच मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
आसाममध्ये १७ जिल्हे प्रभावित
आसाममधील १७ जिल्हे पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. तर ७८ हजाराहून अधिक लोक आपत्तीमुळे बाधित झाले आहेत. याशिवाय १२०० हून अधिक लोकांना पाच वेगवेगळ्या शिबिरांमध्ये मदत पाठवण्यात आली आहे. तर लखीमपूर जिल्हा सर्वात जास्त पूरग्रस्त असून, ४१ हजार ६०० हून अधिक लोक संकटात सापडले आहेत. तर पूरग्रस्त आसाममध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.