नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरात मागील दोन दिवसांपासून, विशेषतः गंगापूर धरण परिसरात, संततधार व मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा टप्याटप्याने विसर्ग करण्यात येत आहे. या पाण्यामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढली असून नदीकाठच्या भागांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या वाढलेल्या पाण्यामुळे पंचवटी परिसरात गोदावरी नदीकाठी असलेली अनेक मंदिरे जलमय झाली असून परिसरातील लहान-मोठ्या व्यवसायिकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. काही टपऱ्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचीही माहिती मिळत आहे.अशा संकटमय परिस्थितीत, मनपा पंचवटी विभागातील राष्ट्रीय फेरीवाला धोरण पथकाने वेळीच हस्तक्षेप करत महत्त्वपूर्ण बचाव कार्य हाती घेतले. या पथकाने नदीकाठच्या सर्व व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना देत, अनेक टपऱ्या वेळीच सुरक्षित स्थळी हलविल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळले असून, दोन व्यावसायिकांचे प्राणही वाचवण्यात यश आले आहे.
पुढेही पाण्याचा जोर वाढल्याने आणखी काही टपऱ्यांना धोका निर्माण झाला होता, मात्र त्याही परिस्थितीत बचाव पथकाने प्रयत्न करून नुकसान कमी केले. हे संपूर्ण बचाव कार्य पंचवटी विभागाचे सहाय्यक आयुक्त मदन हरिचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे सहाय्यक अधीक्षक राजेश सोनवणे, प्रकाश उखाडे, भाऊसाहेब शिंदे, ईश्वर शेंडके, व कैलास गायकवाड यांचा मोलाचा सहभाग होता.
बचाव पथकाकडून संपूर्ण गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




