पारनेर । तालुका प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात फुलांना चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर फुलांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. भाव इतके कोसळले आहेत की, शेतकऱ्यांना आपली फुले रस्त्यावर किंवा शेतात फेकून देण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे त्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत झेंडू, गुलाब, शेवंती, गुलछडी अशा फुलांना मोठी मागणी होती. परंतु, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे, झेंडू फक्त १० ते २० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर ॲस्टरला ३० ते ४० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. गुलाबाचा भाव १०० रुपये प्रति किलो, गुलछडी १५० ते २०० रुपये प्रति किलो आणि शेवंती ५० ते ६० रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे. हे दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहेत.
शेतकरी मोठ्या कष्टाने फुलांचे पीक घेतात. खतांच्या वाढलेल्या किमती, औषध फवारणीसाठी होणारा प्रचंड खर्च आणि मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणींना तोंड देत ते शेतात राबतात. मात्र, जेव्हा त्यांच्या मालाला मातीमोल भाव मिळतो, तेव्हा त्यांचे सर्व कष्ट वाया जातात.
नगर-पुणे महामार्गावर एका शेतकऱ्याने टँपोभर झेंडूची फुले रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे दृश्य पाहायला मिळाले. ही फुले तोडण्यासाठी मजुरांना पैसे द्यावे लागतात, कारण ती झाडावरच राहिली तर झाड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुले तोडूनही ती फेकून द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मजुरीचा खर्च आणि उत्पादन मूल्य असे दुहेरी नुकसान होत आहे.
नुकसान होत असूनही शेतकरी आगामी सण-उत्सवांच्या, विशेषतः नवरात्रोत्सवाच्या हंगामाची वाट पाहत आहेत. नवरात्रीत फुलांना चांगला बाजारभाव मिळेल अशी त्यांना आशा आहे. सध्या तोडणीला आलेल्या फुलांचे भाव मिळत नसल्याने, सोन्यासारख्या मालाचे मातीत रूपांतर झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.





